जिल्ह्यात टॅँकरने गाठली पन्नाशी
By Admin | Updated: February 17, 2016 00:43 IST2016-02-17T00:37:39+5:302016-02-17T00:43:43+5:30
टंचाईची झळ : गतवर्षाच्या तुलनेत चारपट वाढ

जिल्ह्यात टॅँकरने गाठली पन्नाशी
नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, गत वर्षापेक्षा जवळपास चार पटीने यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने फेब्रुवारीच्या मध्यावर टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरने पन्नाशी गाठली. अपुरा पडलेला पाऊस व उन्हाचा वाढता तडाखा पाहता, यंदाचा उन्हाळा सर्वांचीच कसोटी पाहणारा ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती पाहता यंदा जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे उभे ठाकणार आहे. गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने नदी, नाल्यांमधून पाहिजे त्या प्रमाणात पाणी वाहिले नाही तर विहिरींनाही पाणी उतरले नसल्याने जानेवारीपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी केली जात आहे. (पान ५ वर)
नळ पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत आटल्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची झळ सिन्नर तालुक्याला बसली असून, ६३ गावे, वाड्यांना १२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल येवला तालुक्यात २७ गावांना १३ टॅँकरने, तर नांदगाव तालुक्यातील ३९ गावांना ७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बागलाण तालुक्यातील १५ गावांसाठी १० टॅँकर सुरू आहेत.
उन्हाचा तडाखा फेब्रुवारीच्या मध्यान्हातच वाढल्याने येणाऱ्या काळात त्याची तीव्रता आणखी वाढेल, परिणामी पाण्याच्या मागणीतही वाढ होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. जिल्'ातील धरणांमध्ये जेमतेम २२ टक्के पाणी असून, त्यातील काही धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत टॅँकरने पन्नाशी गाठल्यामुळे उन्हाळा अखेर हीच संख्या तीनशेच्या पुढे जाईल, अशी भीती शासकीय यंत्रणा व्यक्त करीत आहे.