तहानलेल्या गावांना टँकरचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:15 IST2016-05-09T22:55:31+5:302016-05-10T00:15:19+5:30
तहानलेल्या गावांना टँकरचा आधार

तहानलेल्या गावांना टँकरचा आधार
शैलेश कर्पे सिन्नर
दुष्काळाचाच भोगवटा असलेल्या सिन्नर तालुक्याला यंदा अंमळ अधिकच चटके सहन करण्याची वेळ आली आहे. मुदलात या तालुक्यात नैसर्गिक जलस्रोतांची वानवा असतानाच दुसरीकडे बहुतांश पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येथील काही गावांना तर वर्षभर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १७ गावे आणि १५३ वाड्या-वस्त्यांवर दररोज २८ टॅँकरद्व्रारे पाणी पुरविले जात आहे. २८ टॅँकरच्या दररोज तालुकाभरात सुमारे १०३ फेऱ्या होत आहेत. टॅँकरच्या फेऱ्यांनी शंभरी गाठली असून, टॅँकर आल्याशिवाय या गावांतील नागरिकांची तहान भागली जात नाही. यंदा पूर्ण नाशिक जिल्ह्यालाच दुष्काळाचे चटके बसत असले, तरी त्याची दाहकता सिन्नरला काहीशी अधिकच आहे. अख्ख्या तालुक्याचे माळरान झाले असून, चारही दिशांमध्ये कोठेही पाण्याचा टिपूस दिसत नाही. दाहीदिशांना मैलोन्मैल भटकत हंडाभर पाणी वाहणाऱ्या महिला आणि सरकारी कृपेने विहिरीत सांडणारे पाणी शेंदून ते मिळेल तसे घरापर्यंत नेणारी बायामाणसं असोत किंवा चाऱ्याअभावी तडफडणारी अन् शेवटी बाजाराच्या वाटेवर नेली जाणारी जनावरे.. मन विषण्ण करणारे असे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.सिन्नर तालुक्यातील फुलेनगर, खापराळे, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, निमगाव-सिन्नर, निऱ्हाळे, के. पा. नगर, यशवंतनगर, फर्दापूर, देवपूर, गुळवंच, डुबेरे, घोटेवाडी, धोंडवीरनगर, सुंदरपूर, जयप्रकाशनगर, नळवाडी या १७ गावांसह १५३ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्यातील पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांत दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनावरांसाठी छावणी किंवा चारा डेपो सुरू होण्याची गरज होती; मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला जात आहे.
ग्रामीण भाागात १७ गावांसह १५३ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी फेऱ्या नियमित होत नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते. टॅँकर नादुरुस्त होणे, टायर फुटणे या कारणांमुळे अपेक्षित फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा घसा कोरडा राहण्याची वेळ येते. अनेकदा गावात टॅँकर आल्यानंतर भांडणे होतात.
दररोज एक लाख रुपयांचे डिझेल
सिन्नर तालुक्यातच २८ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून, सांप्रत त्याद्वारे १७ गावे व १५३ वाड्या-वस्त्यांवर दररोज १०३ फेऱ्या करीत पाणी पुरविले जात आहे. या टॅँकर्सला दररोज सुमारे एक लाख रुपयांचे डिझेल लागते. विशेष म्हणजे, प्रशासनाकडे ४० लाखांहून अधिक इंधन खर्च थकलेला आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण केंद्रातून टॅँकर्समध्ये पाणी भरले जात असून, १०३ वेळा टॅँकर्स भरण्यासाठी दररोज सुमारे ७ ते ८ हजार रुपये पाणीपट्टी अदा करावी लागत आहे. याशिवाय १५ खासगी टॅँकर्सचे भाडे, चालकांचा प्रवासभत्ता, टायर्स, टॅँकर्सची देखभाल यासाठी प्रशासनाला दररोज सुमारे एक लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.
आडातच नाही.. पोहऱ्यात कोठून?
सिन्नर तालुक्यात नैसर्गिक जलस्रोत नाहीत. पावसाळा संपताच बहुतांश सर्वच विहिरी, नाले कोरडेठाक पडले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकही विहीर अधिग्रहित करण्यात आलेली नाही. जवळपास सर्वच कूपनलिका आटल्यामुळे त्या अधिग्रहित करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला टॅँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
तालुक्यातील बहुतांश पाणी योजना विस्कळीत झाल्या आहेत. मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह ५ गाव योजना, नायगाव पाणी योजना, ठाणगाव पाणीपुरवठा योजना या कशाबशा तग धरून आहेत. मात्र मे अखेरीस या योजना धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या काही योजनांचा अपवाद वगळता अन्य योजना विस्कळीत झाल्या आहेत. अनेक गावांच्या नळपाणीपुरवठा योजना उद्भव आटल्याने धूळ खात पडल्या आहेत. भोजापूर धरणात मृत साठा शिल्लक आहे. त्यातून कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अजून तरी सुरळीत सुरू आहे. पावसाळा लांबल्यास ती संकटात येण्याची शक्यता आहे. उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनादेखील सुरळीत सुरू आहे. वावीसह ११ गावे पाणीपुरवठा योजनेला गोदावरी कालव्यातून कोळगावमाळ येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने अजून तरी तग धरून आहे.