ताहाराबाद रस्ता धोकेदायक
By Admin | Updated: June 12, 2016 23:30 IST2016-06-12T23:15:56+5:302016-06-12T23:30:28+5:30
नामपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नाराजी

ताहाराबाद रस्ता धोकेदायक
द्याने : नामपूर-ताहाराबाद रस्ता हा अत्यंत रहदारीचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूचा सापळा बनला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक दुचाकीस्वारांना अपंगत्व आले आहे. रस्ता
रुंदीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळत पडला असून द्याने गावाजवळील अपघाती वळणावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत असतात. द्याने ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत साइड पट्ट्या खोल गेल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेकदा हुज्जत घालून रस्ता द्यावा लागतो. अवैध वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व अॅपेरिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात. पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अनेकदा अपघात होत असतात. थातूरमातूर कारवाई करण्यात येते. परत ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दिशादर्शक फलक चोरट्यांनी लंपास केल्याने बांधकाम विभागाचे कर्मचारी नवीन फलक लावण्याची तसदी घेत नाहीत. पावसाळ्यात रस्त्यावरील साइडपट्ट्यांमुळे अनेक वाहने घसरतात. रस्ता रुंदीकरण कामाचे घोडं अडलंय कुठे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. अनेकदा निवेदने रास्ता रोको आंदोलन करूनही रस्ता रुंदीकरण कामास मुहूर्त मिळत नाही. ताहाराबादपासून ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्ता रु ंदीकरण झाले असून आसखेडा गावाजवळील जिल्हा परिषद शाळेजवळ साईडपट्ट्या खोदलेल्या असून पावसाळ्याअगोदर काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
रस्त्यावरील दुतर्फा असलेली बरीचशी झाडे वाळली असून रस्त्यालगत असलेली झाडे शेतकऱ्यांनी तोडून टाकली आहेत. मैलबिगारी पावसाळा सुरू होण्याअगोदर हजेरी लावतात. पावसाळा सुरू होण्याअगोदर कामे पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे. (वार्ताहर)