साखरेचा तिढा सुटला!
By Admin | Updated: July 29, 2014 00:53 IST2014-07-28T23:46:33+5:302014-07-29T00:53:34+5:30
सणासुदीचा दिलासा : चार दिवसांत उपलब्ध

साखरेचा तिढा सुटला!
नाशिक : जवळपास आठ महिन्यांपासून रेशनमधून गायब झालेली साखर आता पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अलायन्स ट्रेडर्स या मुंबईस्थित कंपनीशी करार केल्याने यापुढे सणासुदीत गोरगरिबांना गोडधोड करून खाता येणार आहे.
येत्या चार दिवसांत मुंबईहून साखर थेट तालुक्याच्या धान्य गुदामात पोहोचेल व त्याचे तातडीने रेशनमधून वाटप करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिल्या आहेत. लेव्हीची साखर देण्यास कारखाने टाळाटाळ करीत असल्याने आठ महिन्यांपासून साखरेचा तिढा निर्माण झाला होता. सरकार साखरेचा कोटा मंजूर करीत असले, तरी कारखाने साखर नसल्याची सबब पुढे करून साखरच देत नसल्याने शासनाचे आदेश कागदोपत्रीच ठरले. त्यानंतर शासनाने खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. व त्यासाठी जिल्हा पातळीवरच निविदा मागविण्यात आल्या. परंतु या निविदांमधील अटी-शर्तींची पूर्तता करू शकणारा एकही ठेकेदार पुढे न आल्याने शिधापत्रिकाधारकांना साखर उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न लोंबळकत पडला. आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासकीय पातळीवर सूत्रे फिरून शासनाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांकडून साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, अन्नपूर्णा व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींसाठी सुमारे १०,५८१ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली.