नाशिक : पोलिसांकडून विनाकारण दिल्या जात असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ गुरुवारी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने सामूहिक रजा आंदोलन केल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले. अधिकारीच कार्यालयात नसल्याने कर्मचाऱ्यांनीही कामकाजात फारसा रस न घेता घरचा रस्ता धरला. हिंगोलीचे पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोथवट यांना सीआरपीसी कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करून थेट अटक करण्याची कारवाई पोलिसांनी केली असून, बोथवट यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला होता. असे असताना पोलिसांनी त्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता थेट अटक केली व सरकारनेही चौकशी न करता त्यांना निलंबित केल्याची बाब राज्यातील महसूल अधिकाऱ्यांना खटकली आहे. महसूल खात्याने बरीचशी कामे अर्धन्यायीक पद्धतीची व जमीन महसूल विषयक असल्यामुळे त्यात दाद मागण्याची तरतूद संबंधिताना देण्यात आली आहे. परंतु पोलीस त्याचा विचार न करता, सरसकट गुन्हा दाखल करून छळत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात शासनाच्या निदर्शनास ही बाब या आधी आणून देण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे जिल्ह्णातील तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन केले.
उपजिल्हाधिकाऱ्यांची सामूहिक रजा
By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST