विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रस्ता बंद
By Admin | Updated: July 3, 2016 22:39 IST2016-07-03T22:37:41+5:302016-07-03T22:39:49+5:30
वडाळीनजीक : निफाड तहसील कार्यालयात ठिय्या

विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रस्ता बंद
निफाड : शेतकऱ्यांच्या वादामुळे एका शेतकऱ्याने चक्क शिवरस्त्यावर काटे व काचा टाकून हा रस्ताच बंद केल्याने विद्यार्थी व नागरिकांनी शनिवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडल्याने निफाड तहसील प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत हा शिवरस्ता मोकळा करून दिला़
निफाड तालुक्यातील वडाळी नजीक, पिंपरी आणि अहेर वस्ती येथील रहिवाशांना निफाड कारखाना भाऊसाहेबनगर या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ता स्थानिक शेतकरी त्याच्या शेजारील शेतकऱ्याच्या वादातून रस्त्यावर काटे, दगड, काचा टाकून तीन महिन्यापासून मधून मधून बंद करीत होता़
सदर रास्ता मोकळा केल्याशिवाय आम्ही तहसील कार्यालय परिसर सोडणार नाही, अशी भूमिका उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी घेतली. विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या वतीने बाजीराव घोलप, नितीन अहेर, वाल्मीक घोलप, संदीप अहेर, रवि अहेर, संपत अहेर, दत्तू अहेर, आप्पा घोलप, प्रकाश घोलप, नंदू घोलप आदि उपस्थित होते. नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी लगेच याबाबत पालक आणि रस्ता बंद केलेल्या शेतकऱ्याला बोलावून घेतले. या रस्त्याच्या वादाची कागदपत्रे पाहून निर्णय घेऊ, तूर्तास रस्ता विद्यार्थ्यांना जायला मोकळा करा, असे आवाहन केले. परंतु हा अनेक दिवसांचा वाद असल्याने योग्य तो एकदाचा निर्णय लावा असा पवित्रा रस्ता बंद केलेल्या शेतकऱ्याने घेतला. विनोद भामरे, शांताराम पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, भाबड, सर्कल, तलाठी यांचे पथक प्रत्यक्ष भाऊसाहेबनगर येथील वादग्रस्त शिवरस्ता येथे दाखल झाले. मोजणी अधिकाऱ्यांनी या शिवरस्त्याची मोजणी केली. लगेच हा शिवरस्ता मोकळा केला़ चिमुकल्यांना शाळेत जायचा मार्ग मोकळा झाला़ (वार्ताहर)