आमदार पुस्तक पेढीने रोखली विद्यार्थी गळती
By Admin | Updated: August 3, 2014 01:58 IST2014-08-03T01:25:38+5:302014-08-03T01:58:42+5:30
आमदार पुस्तक पेढीने रोखली विद्यार्थी गळती

आमदार पुस्तक पेढीने रोखली विद्यार्थी गळती
सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन भोसले यांनी मागील वर्षापासून सुरू केलेल्या ‘आमदार पुस्तक पेढी’ या उपक्रमामुळे शाळांतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले असून, पुस्तक पेढीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविल्या गेलेल्या या उपक्रमाचा मागील वर्षी सुमारे साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. यावर्षीही तेवढ्याच संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. परंतु पुढे नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे पैशांअभावी गरीब व गरजू विद्यार्थ्यांची शाळांमधून गळती होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकांकडे पाठ्यपुस्तके नसल्याने त्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम दिसून येत होता. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांचा गुणवत्तापूर्ण विकास साध्य करण्यासाठी आमदार नितीन भोसले यांनी ‘आमदार पुस्तक पेढी’ची संकल्पना मागील वर्षी आपल्या मतदारसंघात राबविली. त्यासाठी खास प्रशासकीय मान्यता घेऊन आमदार निधीतून ५३ लाख २२ हजार २०४ रुपयांची तरतूद करण्यात आली.
भोसले यांनी आपल्या मतदारसंघातील ३१ अनुदानित माध्यमिक शाळांची निवड करून नववीच्या ५३७६ व दहावीच्या ५२३४ अशा एकूण १० हजार ६१० विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके मोफत वितरित केली. विशेष म्हणजे, पुस्तके वर्षभर सुस्थितीत राहावी यासाठी भोसले यांनी स्वत:च्या वैयक्तिक खर्चातून अडीच लाखांची एक लाख कव्हर्सही वितरित केली. वर्षभरानंतर भोसले यांनी आमदार पुस्तक पेढी संकल्पना राबविलेल्या शाळांकडून माहिती संकलित केली असता पुस्तक पेढीमुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले, तर लाभार्थींमध्ये नववीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला.
दहावी परीक्षेत १०२ विद्यार्थी ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर ८० ते ९० टक्के गुणांच्या दरम्यान ७५ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे आढळून आले. पुस्तक पेढी उपक्रमाबरोबरच भोसले यांनी मनपा शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मतदारसंघातील शाळांना संगणक व प्रोजेक्टरचेही वाटप केले आहे. (*वार्ताहर)