भूमिपुत्रांची भक्कम पाठराखण...
By Admin | Updated: June 26, 2014 00:48 IST2014-06-26T00:41:01+5:302014-06-26T00:48:09+5:30
भूमिपुत्रांची भक्कम पाठराखण...

भूमिपुत्रांची भक्कम पाठराखण...
प्रांतीय अस्मिता कट्टरपणे सांभाळणारा देवळा तालुका चांदवड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात निर्णायक भूमिका वठवित असतो.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवळा तालुक्यातून भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी मिळाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत देवळा तालुक्यातून भाजपाच्या अरुण अहेर यांना मतदारांनी मोठी आघाडी दिली होती. परंतु चांदवड तालुक्यातून आघाडी टिकविता न आल्याने अहेर यांना पराभूत व्हावे लागले होते व अपक्ष उमेदवार शिरीष कोतवाल विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार उत्तम भालेराव देवळा तालुक्यात तिसऱ्या स्थानावर होते. मनसेच्या उमेदवारानेही प्रत्येक गावातून मते मिळवून आपले अस्तित्व दाखवून दिले होते. गत विधानसभा निवडणुकीत चांदवड तालुक्यातून भाजपाला अत्यल्प मते मिळाली होती. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांदवड तालुक्यातून ४५ हजार मतांची भरघोस आघाडी मिळाली असली तरी त्यात मोदी लाटेचा प्रभावही मोठा होता. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत हेच वातावरण कायम राहिले तर भाजपाला त्याचा फायदा होऊ शकतो.
गत विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघाची नवीनच निर्मिती झाली होती. त्यापूर्वी देवळा तालुका हा कळवण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होता. देवळा तालुक्याचा चांदवड मतदारसंघात समावेश झाल्यामुळे राजकीय गणिते बदलली. परंतु चांदवड व देवळा तालुक्याची नाळ मात्र जुळली नाही. यामुळे भाजपाला देवळा तालुक्यात आघाडी, तर चांदवड तालुक्यात अस्तित्वासाठी लढाई असे चित्र विधानसभा निवडणुकीत दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भालेराव यांना नाराजीचा फटका बसला. अरुण अहेर ेंयांच्याबाबत शिवसेनेची असलेली नाराजी कोतवाल यांच्या पथ्थ्यावर पडली. अपक्ष असूनही कोतवालांनी देवळा तालुक्यात साडेतेरा हजार मते मिळविली. चांदवड तालुक्यात कोतवाल व भालेराव यांच्यात मतांची विभागणी झाली. त्यामुळे साहजिकच देवळा तालुक्यातून कोतवालांना मिळालेली मते त्यांना विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरली. गत विधानसभा निवडणुकीत देवळा व चांदवड तालुक्यातील मतदारांची मानसिकता ही पक्षाऐवजी तालुक्यातील उमेदवाराला प्राधान्य देण्याची दिसून आली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र दोन्ही तालुक्यातून भाजपाला मतदारांनी मोठी आघाडी दिली.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत पाणीप्रश्न हाच कळीचा मुद्दा राहणार आहे. निवडणूक प्रचार काळात खासदार चव्हाण यांनी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिलेले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पाणीप्रश्नाबाबत खासदार चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात याचाही विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर प्रभाव पडणार आहे. देवळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खर्डे खोऱ्यातील जनतेने लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खासदार चव्हाण यांची पाणीप्रश्नाबाबत आश्वासक भूमिका दिसल्याने मागे घेतला होता व भाजपाच्या पारड्यात भरघोस मते टाकली होती.
तालुक्याच्या पूर्वभागातही पाणीप्रश्न गंभीर आहे. देवळा तालुका हा सर्वस्वी चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु ह्या कालव्याची वहनक्षमता खूपच कमी असल्याने तालुक्याची तहान भागत नाही. रामेश्वर धरणापुढील झाडी एरंडगावपर्यंत जाणाऱ्या ह्या वाढीव कालव्याचे काम अपूर्ण असून, ह्या कालव्याला ठिकठिकाणी वितरिका काढण्याची मागणी ह्या भागातील जनता करीत आहे. देवळा तालुक्याची सर्व महाराष्ट्रात ओळख निर्माण करणार वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना दीड वर्षांपासून बंद पडल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वसाका कामगारांची परिस्थिती वेतन बंद झाल्याने हलाखीची झाली आहे. तालुक्यात मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारांची संख्या मोठी आहे. देवळा तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे. तालुक्यातील अनेक गावांतील नवीन पाणीपुरवठा योजना अयोग्य व्यवस्थापनामुळे अपूर्ण अवस्थेत आहेत किंवा काम पूर्ण होऊनही सुरू झालेल्या नसल्याने बहुतेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला जनतेला तोंड द्यावे लागत आहे. ह्या सर्व योजनांची चौकशी होणे गरजेचे आहे.
सध्या तरी भाजपाचे तिकीट देवळा तालुक्यात कोणास मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपा कार्यकर्तेही ज्याला भाजपाचे तिकीट मिळेल त्याचे मागे उभे राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेची नाराजी यावेळी ओढवणार नाही याची काळजी तालुक्यातील भाजपा नेत्यांना घ्यावी लागणार आहे. विद्यमान आमदार शिरीष कोतवाल यांनीही तालुक्यात आपला गट निर्माण केला असल्याने विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा अपक्ष निवडणूक लढवितात की पक्षातर्फे लढतात हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जसे विक्रमी मतदान झाले तसेच विधानसभा निवडणुकीतही होईल असे दिसते.