रहदारीस अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई
By Admin | Updated: September 2, 2014 01:14 IST2014-09-01T22:08:46+5:302014-09-02T01:14:15+5:30
रहदारीस अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई

रहदारीस अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई
नांदगाव : रस्त्यांवर बसून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आज मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कणखर भूमिका कायम ठेवून लागोपाठ तिसऱ्या दिवशी रस्ता मोकळा ठेवल्याने नागरिकांनी प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.
फळ व भाजी विक्री करणे हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आपणास सद्यस्थितीत आहे त्याच ठिकाणी थोडे मागे सरकवून रस्त्यावरच बसू द्यावे, अशी विक्रेत्यांनी मागणी केली. मात्र यापूर्वी अशाचप्रकारे प्रशासनाने सवलत दिली होती. परंतु थोड्याच दिवसात विक्रेत्यांनी ती धाब्यावर बसवून संपूर्ण रस्ता पुन: व्यापून टाकल्याचा इतिहास असल्याने यावेळी तसे होऊ नये म्हणून प्रशासनाने सदर मागणी फेटाळून लावली. वर्षानुवर्षे सदर व्यवसाय करत असल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व रस्ता मोकळाच ठेवावा, अशी सूचना नगराध्यक्ष रामनिवास कळंत्री, नगरसेवक शिवाजी पाटील, बाळासाहेब कवडे, अरुण पाटील, विलास राजोळे व विश्वास आहिरे यांनी केली. विक्रेत्यांच्या वतीने सुनील जाधव यांनी ती मान्य केली.
सकृतदर्शनी सदर जागा योग्य असल्याचे उपस्थितानी मान्य केल्यानंतर प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मात्र काही तांत्रिक व कायदेशीर बाबींची पडताळणी केल्यानंतर येत्या आठ दिवसांत दीर्घकालीन विचार करून सकारात्मक पावले उचलली जातील व पर्यायी व्यवस्था आकाराला येईपर्यंत विक्रेत्यांचा विचार करू, असे मुख्याधिकारी गायकवाड यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी अडथळे हटविण्याच्या कारवाईची सुरुवात केली होती. (वार्ताहर)