वादळीवाऱ्याचा जिल्ह्याला फटका

By Admin | Updated: June 9, 2014 00:33 IST2014-06-09T00:25:41+5:302014-06-09T00:33:08+5:30

महावितरण : २२५७ विजेचे खांब जमीनदोस्त

The storm district is hit by the storm | वादळीवाऱ्याचा जिल्ह्याला फटका

वादळीवाऱ्याचा जिल्ह्याला फटका

 

नाशिक : गेल्या दोन आठवड्यांमध्ये नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यांसह पावसाने महावितरण कंपनीचे सुमारे पावणेपाच कोटींचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. महावितरण कंपनीच्या नाशिक परिमंडलात तीन हजारांपेक्षाही अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाले असून, यातील २२५७ खांब हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे काही भागात विजेच्या पुरवठ्याअभावी अंधाराचे साम्राज्य होते.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये नाशिकसह नगर जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. या वादळीवाऱ्याच्या तडाख्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले होते, तर हजारो वृक्ष उन्मळून पडली. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीच्या नाशिक परिमंडलातील हजारो विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे काही परिसरात विजेचा पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, मनमाड, सटाणा, निफाड, कळवण, द्वारका, सातपूर, जुने नाशिक, देवळाली कॅम्प, गिरणारे, त्र्यंबकेश्वर, हरसूल, कोने या परिसरातील विजेचे खांब मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाले होते, तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, राजूर, पारनेर, कर्जत, नेवासा याठिकाणीही वादळीवाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले होते. याकाळात सुमारे ३१०० विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वृक्षच खांबांवर पडले होते, तर काही ठिकाणी वादळीवाऱ्याने खांब वाकून उन्मळले होते. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यामध्ये २२५७ विजेच्या खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक भागात विजेअभावी अंधाराचे साम्राज्य होते तसेच अनेक समस्यांना वीज ग्राहकांना सामोरे जावे लागले होते. सदरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक तास जावे लागल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The storm district is hit by the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.