नाशिक, दि. १० - पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या कोणत्याही कार्यालयामध्ये यापुढे कोणतीही पूजा अथवा धार्मिक कार्यक्र म करू नयेत, अशा सूचना गुन्हे विषयक बैठकीमध्ये देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुण्याचे तत्कालीन आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांत्रिकाची मदत घेतल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सत्यनारायण पूजा तर नित्यनियमानेच केली जात असल्याने, आता त्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊनच आपली कामगिरी बजवावी हा यामागील दृष्टीकोन असल्याचे बोलले जाते. लिंबू-मिरची; काळी बाहुलीचा घेराघराला, गाडीला, दुकानाला नजर लागू नये म्हणून किंवा काही विक्षिप्त प्रकार घडू नये म्हणून लिंबू-मिरची बांधण्याची अंधश्रद्धा आपल्याकडे अगदी सर्रासपणे पाहायला मिळते. लिंबु मिरची बांधली किंवा काळी बाहुली लटकवली म्हणजे कुणाचीही वाईट नजर लागणार नाही असा समज लोकांमध्ये आहे. देशातील कुठल्याही भागात गेल्यास हा प्रकार बघावयास मिळत असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ठिकठिकाणी ‘लिंबू-मिरची टांगणे बंद अभियान’ राबविले होते. परंतु या अभियानाचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नसल्याचेच बघावयास मिळत आहे. लिंबु-मिरचीच्या घेऱ्यात केवळ अशिक्षित मंडळीच गुरफटलेली आहे असे नाही तर, शिक्षित व उच्च शिक्षित मंडळी देखील लिंबू-मिरचीच्या या मोहातून मुक्त झालेले नसल्याचे चित्र बघावयास मिळते. हल्ली तर अंधश्रद्धेप्रकरणी बुवा-बाबांचा पडदाफास करणारेच अंधश्रद्धेला कळत नकळत खतपाणी घालत असल्याने, आता त्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या मंडळींकडून बोलले जात आहे. डोळस अधिकारीही हतबल पोलिस दलातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी डोळसपणे विचार करणारे आहेत. पण, अंधश्रद्धेच्या या परंपरा बदलण्यास त्यांनाही फारशे यश येत नसल्याचेच चित्र बघावयास मिळते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांना पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाज्यावर लटकवलेल्या ‘कोहळा’ या फळाबाबत विचारले असता, त्यांनी हतबलता दर्शवित याचा माझ्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे आपण हे फळ काढणार काय? असे विचारले असता, त्यांनी समर्पक उत्तर न देता, माहिती घेऊन विचार करू असे सांगितले. पोलिसांची अंधश्रद्धा नुकसान करणारी आहे काय?पोलिसांमध्ये असलेल्या अंधश्रद्धेविषयी काही अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी, पोलिसांमधील या अंधश्रद्धेविषयी आम्हाला माहिती आहे. पोलिसांनी आता हे विचार सोडून द्यायला हवेत. पण, ते पाळत असलेल्या अंधश्रद्धेपासून कुणाचेही नुकसान होत नाही. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्नच नाही, असे सांगण्यात आले. तसेच पोलिसांच्या अशा कृतीतून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याची मानसिकता वाढीस लागत असून, पोलिसांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. अमावस्येची रात्र म्हणजे देवाची खास उपलब्धीअमावस्येच्या रात्री सर्वाधिक चोरींच्या घटनांची नोंद होत असल्याने, अमावस्येच्या रात्रीबाबत चोरांबरोबरच पोलिसांमध्ये देखील प्रचंड गैरसमज आहेत. वास्तविक अमावस्येच्या रात्री किर्रर्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात. मात्र अमावस्येची रात्र ही खास चोरी करण्यासाठी असते, चोरांसाठी ती देवाची खास उपलब्धी आहे, असा समज काही चोरांचा आहे. त्यामुळे बहुतेक चोरटे या दिवशीच चोरीचा बेत आखतात. पोलीसांमध्ये देखील या रात्रीबाबत अनेक गैरसमज असल्याने, ते देखील अमावस्येचा दिवस अंधाश्रद्धात्मक दृष्टीकोनातून बघतात. वास्तविक चोरटे अंधाराचा फायदा घेऊनच चोरी करीत असल्याने अमावस्येच्या रात्रीला अंधश्रद्धेचा जोड देण्याची काहीही गरज नसल्याचे अंनिसकडून स्पष्ट करण्यात आले.
पोलीस ठाण्यातील पूजापाठ होणार बंद
By admin | Published: July 10, 2014 10:25 PM