Join us  

तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 7:43 AM

Aditya Thackeray On Raj Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली.

Aditya Thackeray On Raj Thackeray ( Marathi News ) : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहे, पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघात मतदान होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी 'बोल भिडू' या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे.

गुढी पाडवा मेळाव्यादिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आदित्य ठाकरे यांनी रोजगार, गुजरातला गेलेल्या कंपन्या या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टोला लगावला आहे. 

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंबाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले, मी त्यांना कधीही उत्तर देत नाही. आमचं एक वेगळं नात असल्यामुळं मी त्यांच्यावर कधीही बोलत नाही. मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मला मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की,  गेल्या दोन अडीच वर्षात याच भाजपाने महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन यासह एक लाख रोजगार महाराष्ट्रातून उचलून गुजरातला दिला आहे. बल्क ड्रग पार्क यातून ३० ते ४० हजार जणांना रोजगार मिळणार होता तोही गुजरातला गेला. मेडिकल डिव्हाईस पार्क ४० हजार रोजगार मिळणार होता उचलून गुजरातला पाठवला. टाटा एअरबस असेल, सोलर प्लॅट असेल, टेक्टाईल पार्क असेल, हेच काय आपली वर्ल्डकपची फायनल आपल्या क्रिकेटची पंढरी आपण ज्याला म्हणतो वानखेडे येथून उचलून गुजरातला घेऊन गेले. ईडन गार्डनर झाली असती तर मी समजू शकलो असतो. मनसेचा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा या सगळ्याला आहे का? , असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना लगावला.    

'भूमिपुत्र रोजगार मागतोय'

"मनसे एवढ्या दिवस भूमिपुत्रांसाठी,मराठी माणसांसाठी भांडत होते असे आम्हाला सांगितले. आज आपला भूमिपुत्र रोजगार मागत आहे. त्यांची सगळी स्वप्न चिरडली जात आहेत. हे सगळे उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. गुजरातला जाऊन त्यांचे भले होत आहे असं नाही. त्यांनी आता तिथे जाऊन आम्ही कामच करु शकत नाही असे सांगितले आहे. सेमी कंडक्टर इंडस्ट्री आपल्या देशातून निघून गेली, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 'टेस्ला मुंबईत येणार होती, त्यांचं शोरूम आणि गोडाऊन मुंबईत होणार होते पण केंद्र सरकारच्या अटींमुळे ते येऊ शकले नाहीत, असंही ठाकरे म्हणाले.     

टॅग्स :आदित्य ठाकरेमनसेराज ठाकरेशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४