कांदाप्रश्नी पिंपळगावी रास्ता रोको

By Admin | Updated: June 7, 2016 07:33 IST2016-06-06T23:20:14+5:302016-06-07T07:33:02+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Stop the way to the Pimpalwadi route | कांदाप्रश्नी पिंपळगावी रास्ता रोको

कांदाप्रश्नी पिंपळगावी रास्ता रोको

पिंपळगाव बसवंत : कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या, वीजबिल माफ करा, कर्जमाफी द्या आदि मागण्यांसाठी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड तसेच माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीसमोर मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वतीने सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी दिलीप बनकर यांनी, शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करत आज रस्त्यावर येऊन शासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी, शासनाला दोन वर्षातच शेतकरी मेटाकुटीस आला असून, उत्पादन खर्चावर आधारित किंमत देणारे सरकार कुठे गेले? हेच भाजपा-शिवसेना सरकार दोन वर्षांपूर्वी घोषणा करत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, या रास्ता रोकोत चौफेर टीकास्त्र सोडत राज्य शासनाचे बाभाडे काढले. सरकार अर्थकारण मोहीम आणत असून, देशाच्या पंतप्रधानांना देशात येण्यास वेळ तर नाहीच; परंतु साधे पालकमंत्र्यांनासुद्धा शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याग्रस्त कुटुंबांना भेट देण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. मुख्यमंत्री सांगतात
आमच्यावर अवलंबून राहू नका. आजची परिस्थिती कांद्याची गंभीर झाली आहे. धार्मिक क्लेश निर्माण करून राजकारण करणाऱ्या या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. यापुढे प्रत्येक तहसीलदारांना कांदे मारून आंदोलन उभे करायचे असून, आज शिवराज्यभिषेक दिन आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी आजपासून सुरू केली यापुढे आपणही आंदोलनाने या सरकारला धडा शिकवून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनावर टीकास्त्र सोडत हे सरकार कोणत्या मुहूर्तावर स्थापन झाले काही कळत नाही, महाराष्ट्रावर सतत संकटं येत आहेत. कोण पक्षात व कोण विरोधात कळत नाही. भूखंडाचे श्रीखंड वाटप करणारे हे सरकार दाळ, चिक्की, स्वेटर, जमीन खाते यांना कांद्याचे काय कळणार.
या सरकारमुळे शेतकऱ्यांना कुऱ्हाडी घेऊन बागा तोडण्याची वेळ आली आहे. मेक इन इंडियाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी काय कदर राहणार आहे. आम्ही ३० हजार रुपये एकरी तत्काळ दिले, यांना साधा कांद्याला हमीभाव देता येत नाही. आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही व आगामी तीन दिवसात सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कांदा फेको आंदोलन उभे करून शासनाला जागे करावे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
आजच्या आंदोलनात रवींद्र पगार, राजाराम पानगव्हाणे, अर्जुन बोराडे, अनिल कुंदे, नरहरी झिरवाळ, डॉ. सुधीर तांबे, डॉ. भारती पवार, शोभा मगर, विजयश्री चुंभळे, भास्करराव बनकर, प्रकाश अडसरे, तान्हाजी बनकर, नानासाहेब बोरस्ते, विश्वास मोरे, देवीदास पिंगळे, आमदार जयंत जाधव व निर्मला गावित, डॉ. तुषार शेवाळे, दिगंबर गिते, अर्जुन टिळे, शरद अहेर, अनिल कुंदे, माणिकराव बोरस्ते, प्रकाश अडसरे, प्रेरणा बलकवडे, प्रसाद हिरे, गुरुदेव कांदे, राजेंद्र शिंदे, निवृत्ती धनवटे आदिंसह हजारो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the way to the Pimpalwadi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.