चारा डेपोसाठी रास्ता रोको; शेतकऱ्यांचा उद्रेक

By Admin | Updated: May 8, 2016 22:35 IST2016-05-08T22:34:03+5:302016-05-08T22:35:23+5:30

पांगरी : सिन्नर-शिर्डी मार्गावर कांदे ओतून, टायर जाळून केला शासनाचा निषेध

Stop the way for the feed depot; Outbreaks of Farmers | चारा डेपोसाठी रास्ता रोको; शेतकऱ्यांचा उद्रेक

चारा डेपोसाठी रास्ता रोको; शेतकऱ्यांचा उद्रेक

 पांगरी : सिन्नर तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, कांदा व दुधाला हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी पांगरी येथे सिन्नर-शिर्डी मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून व टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवला.
कांद्याचे गडगडलेले भाव, चारा छावण्या, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे, दुधाला किमान ३० रुपये लिटर भाव मिळावा, पाणी व वीजप्रश्नासह कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवि पगार, आत्माराम पगार, संजय वारुळे, भाऊसाहेब पगार, नीलेश पगार, कृष्णा घुमरे, धनंजय निरगुडे, संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पांगरी येथे सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी सव्वादहा वाजता पांगरी येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले होते. काही शेतकऱ्यांनी सोबत आणलेला कांदा रस्त्यावर टाकून रास्ता रोकोस प्रारंभ केला. लगेच सर्व शेतकरी शासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झाले. सरकारला शेतकऱ्यांची जाण राहिली नसून ते शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे संपत पगार म्हणाले. शेतमालाच्या भावाची वाट लागली असून, दूध व्यवसायाची स्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात विकला जात नसल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आल्याचे पगार यावेळी म्हणाले.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचे हाल होत असताना सरकार झोपा काढत असून, ते शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे अमोल दवंगे यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांची टर उडवत असून, त्याला अधिक कर्जाच्या खाईत लोटण्याची व्यवस्था करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवि पगार यांनी केला.
दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याच्या खर्चाच्या तुलनेत दुधाला अत्यल्प भाव मिळत असल्याचे ते म्हणाले. ३ ते ५ फॅट लागणाऱ्या गाईच्या दुधाला २० रुपये भाव देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. सहा वर्षांपासून सलग दुष्काळ पडला असून, जनावरांना चारा मिळत नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने आम्ही सरकारचा निषेध करत असल्याचे पगार म्हणाले.
वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करताच शेतकरी अधिकच संतापले. कर्जमुक्ती झालीच पाहिजे, कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देत शेतकरी आक्रमक झाले. यावेळी रस्त्याच्या मधोमध टायर पेटवून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली. (वार्ताहर)



शिवसेनेचे गटप्रमुख प्रकाश पांगारकर यांनी आंदोलनास पाठींबा जाहीर केला. काही वेळाने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्यावर टाकलेला कांदा शेतकऱ्यांनी गोळा करुन वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाटून दिला. यावेळी विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम पगार, पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, विश्वनाथ पगार, भोरु निकम, बाजीराव कांडेकर, विठ्ठल पगार, संदीप पगार, सुनील काटे, कचेश्वर गाढे, सोमनाथ पगार, धनंजय निरगुडे, संपत पगार, सुभाष पगार, ज्ञानदेव पगार, राजेंद्र पगार, नामदेव चिने, बाळू पगार, तलाठी आर. डी. चौधरी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, अतुल फलके, हनुमंत कांबळे, रवी जाधव, रवी बारहाते, दत्तू दराडे, अजीत जगधने, कमल खैरनार, रामनाथ देसाई आदींचा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Stop the way for the feed depot; Outbreaks of Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.