पर्वणीत शहर बस वाहतूक बंद
By Admin | Updated: August 25, 2015 23:24 IST2015-08-25T23:22:15+5:302015-08-25T23:24:48+5:30
बाहेरगावी जाण्यासाठी १२ ते १४ किलोमीटर अंतरावर बससेवा

पर्वणीत शहर बस वाहतूक बंद
नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या तीन दिवसांसाठी संपूर्ण नऊ दिवस सार्वजनिक आणि खासगी वाहतूक नियंत्रित करण्याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसणार असून, या कालावधीत शहर बस वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची गर्दी ज्या भागात नाही अशा सातपूर-सिडकोसह कॉलेजरोड मखमलाबाद, आडगाव येथे नागरिकांना प्रवास करणे शक्य होणार नसल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. इतकेच नव्हे तर ज्या नागरिकांना मुंबई-पुणे किंवा तत्सम बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना दहा ते बारा काहींना तर वीस वीस किलोमीटर पायपीट करून बाह्य वाहनतळ गाठावे लागणार आहे.
येत्या २९ आॅगस्ट, १३ सप्टेंबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सामायिक, तर १८ रोजी नाशिक आणि २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी होणार आहे. या पर्वणी कालावधीत प्रशासनाने पर्वणीच्या आदल्या आणि दुसऱ्या दिवशीदेखील वाहतुकीवर नियंत्रणे ठेवून शहरात कोणतेही वाहन फिरणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्याच अंतर्गत नाशिक शहरात मध्यवर्ती भागात सार्वजनिक वा खासगी वाहने नसणे ठीक, परंतु प्रशासनाने परिवहन महामंडळाच्या शहर बस सेवादेखील बंद ठेवण्यास सांगितले आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी नाशिकला आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना बाह्य वाहनतळावरून अंतर्गत तसेच त्र्यंबकेश्वरकडे ब्रह्मा व्हॅली येथील अंतर्गत वाहनतळाकडे नेण्यापलीकडे परिवहन महामंडळाची बस सेवा नसणार आहे. इतकेच नव्हे तर ज्या भागात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा संबंध नाही अशा गंगापूर गाव, शिवाजीनगर, सातपूर, सिडको, चुंचाळे, मखमलाबाद, म्हसरूळ, इंदिरानगर पाथर्डी या भागात जाण्यासाठी कोणतीही बस सेवा नसेल. परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी त्यास दुजोरा दिला.
त्यामुळे या भागात रिक्षाच्या अथवा स्वत:च्या खासगी वाहनांच्या भरवशावरच नागरिकांना राहावे लागणार आहे, परंतु याही पलीकडे जाऊन शहरातून कोणाला अत्यावश्यक म्हणून पुण्याला जायचे असेल तर त्यांना सिन्नर फाट्यापर्यंत पायी चालत जावे लागेल. मुंबई नाक्यावरून महामार्ग बसस्थानकातून विल्होेळी आणि तेथून मुंबई असे जावे लागेल. जिल्ह्यात मालेगाव, निफाड, दिंडोरी किंवा सिन्नर यामार्गावर किंवा तेथून पुढे जायचे असेल तर या मार्गाकडे जाणाऱ्या अंतर्गत वाहनतळावरून बाह्य आणि तेथून संबंधित गाव किंवा तालुक्याकडे जाणारी बस गाठावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)