मनमाड शहरात कडकडीत बंद
By Admin | Updated: June 20, 2014 21:58 IST2014-06-20T21:58:36+5:302014-06-20T21:58:36+5:30
मनमाड : शहरात महावितरणकडून भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मनमाड बंदला कडकडीत बंद पाळण्यात आला.

मनमाड शहरात कडकडीत बंद
मनमाड : शहरात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या भारनियमनामुळे व्यापारी वर्ग देशोधडीला लागण्याची वेळ आली असल्याने हे भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.
एकात्मता चौकात सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी केलेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. शहरातील विविध पक्ष व संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. सकाळी दुकान उघडत नाही तोच भारनियमन सुरू होते आणि संध्याकाळी ज्यावेळेस ग्राहक खरेदीला दुकानात येतात त्यावेळेस संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचे भारनियमन करण्यात येते. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. दुकानात इन्व्हर्टर, जनरेटर ही पर्यायी सुविधा करण्यात आली असली तरी शहरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे ग्राहक खरेदी करण्यासाठी दुकानात येत नाही. भारनियमनामुळे व्यापार करणे कठीण झाले आहे. या विरोधात आज मनमाड बंदचा इशारा शहर व्यापारी महासंघाने दिला. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठविण्यात आले. काल सायंकाळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून फेरी काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, नाना शिंदे, शहराध्यक्ष संतोष बळीद, नितीन पांडे, नारायण पवार, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन, कांतीभाऊ चोबे, प्रकाश लोढा, सलीम सोनावाला, अनिल गुंदेचा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)