...तरीही एसटी बसेस दुरुस्तीचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST2017-08-23T23:19:12+5:302017-08-24T00:25:14+5:30
एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. येथील बसेसचे शेड्युल मात्र काही प्रमाणात वाढविण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

...तरीही एसटी बसेस दुरुस्तीचा प्रश्न कायम
नाशिक : एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. येथील बसेसचे शेड्युल मात्र काही प्रमाणात वाढविण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. बसेसचे कमी केलेले शेड्युल आणि दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसेस तसेच चालक-वाहकावर लादण्यात येणारी बिनपगारी सुटी यामुळे संतप्त कर्मचाºयांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. या संपानंतरही कामकाजात फारशी सुधारणा झाली नसल्याचे समजते. येथील वर्कशॉपमध्ये ५० पेक्षा अधिक बसेस या देखभाल दुरुस्तीसाठी उभ्या असल्याने बुधवारी येथील कामकाजासाठी टीआरपी सेक्शनमधील सात कर्मचाºयांना वर्कशॉप कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाठविण्यात आले आहे. मात्र या कर्मचाºयांना वर्कशॉप कामाबाबतची माहितीच नसल्याने या कर्मचाºयांची बदली निव्वळ औपचारिकच ठरली आहे. येथील बसेस दुरुस्तीबाबत फारसा फरक पडला नसल्याचे अधिकाºयांनी खासगीत सांगितले. मंगळवारपेक्षा बुधवारी मेन्टेनन्सच्या गाड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करीत सुमारे १४० शेड्युल सुरू असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात डेपोत गाड्या उभ्या असून, नवीन मनुष्यबळ देऊनही फारसा फरक पडलेला नाही. खरेतर कमी मनुष्यबळामुळे बसेस दुरुस्तीच्या कामात मोठा अडथळा येत आहेच शिवाय गाडीचे सुटे भागही वेळेवर मिळत नसल्याने बसेस रस्त्यावर आणणे कठीण झाले आहे. असलेल्या मनुष्यबळात बरेचसे कर्मचारी हे सेवानिवृत्तीकडे झुकलेले आहेत. त्यामुळे कामावरही मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी वर्कशॉपमध्ये काम करू शकतील, असे तंत्रज्ञ तसेच अनुभवी कर्मचारी अपेक्षित आहे. मात्र येथे टायर प्लॅन्टचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. हे कर्मचारी येथे काय काम करणार असा सवाल डेपोतीलच अधिकाºयांना पडला आहे. खुद्द येथील अधिकाºयांनीदेखील याबाबतची नाराजी दर्शविली असून निव्वळ संख्या महत्त्वाची नाही तर कौशल्ययुक्त मनुष्यबळ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सुमारे ५० गाड्या या दुरुस्तीसाठी उभ्या होत्या. बुधवारी या गाड्यांची संख्या ३५ ते ४० झाल्याचे डेपोतून सांगण्यात आले. जे कुशल अकार्यक्षम कर्मचारी तेथे अतिरिक्त म्हणून पाठविले असेल तर मग रस्त्यावर आणलेल्या बसेसची खरेच दुरुस्ती झाली आहे का असा प्रश्न येथीलच कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
दोन बसेस उभ्या
मंगळवारी पंचवटी डेपोत झालेल्या आंदोलनात कर्मचाºयांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या ठिकाणी गाड्यांचे सुटे भागच नसल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. एक बस तर निव्वळ आॅईलसाठी पंधरा दिवसांपासून उभी आहे. तर दुसरी बस महिन्यापासून उभी असताना कागदोपत्री मात्र तिला रुटवर दाखविले जात आहे. यातील सत्यतेविषयी कुणीही अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाही. मात्र याविषयीची चर्चा लपून राहिलेली नाही.
अचानक बदल होतोच कसा
रात्री ड्यूटी संपून निघालेल्या कर्मचाºयाला उद्याची ड्यूटी कुठे आणि कोणत्या गाडीवर लागलेली आहे याची माहिती मिळते. परंतु सकाळी कामावर आल्यावर त्यांना गाडी आणि ड्यूटीच उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांना सक्तीने सुटी टाकण्यास सांगितले जाते. मात्र ऐनवेळी ड्यूटी आणि गाडी न देणे आणि बिनपगारी सुटी करण्यामागे प्रशासनाचा कर्मचारीविरोधी डाव असल्याचे बोलले जात आहे.