सतीमाता-सामतदादा यात्रा नियोजन सुरू
By Admin | Updated: February 17, 2016 22:50 IST2016-02-17T22:48:30+5:302016-02-17T22:50:22+5:30
वडांगळी : उघड्यावर बोकडबळी न देण्याचे प्रांताधिकारी मंगरुळे यांचे आवाहन

सतीमाता-सामतदादा यात्रा नियोजन सुरू
वडांगळी : सतीमाता व सामतदादा यात्रेत कोणतीही दुर्घटना
घडणार नाही यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले. भाविकांकडून उघड्यावर बोकडबळी दिले जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंगरुळे
मार्गदर्शन करीत होते. ही यात्रा माघ पौर्णिमा रविवार, दि. २१ पासून सुरू होणार आहे. पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, रामेश्वर वेंजने, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, सरपंच सुनीता सैंद, उपसरपंच नानासाहेब खुळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यात्रोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रत्येक विभागाचा एकमेकांसोबत समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आराखडा तयार करून पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत व देवस्थान संस्थान यांच्याकडे द्यावा, अशी सूचना डॉ. मंगरुळे यांनी केली. यात्रा काळात कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची तत्काळ माहिती देण्याचे आवाहन डॉ. मंगरुळे यांनी केले. यात्रा काळात विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ग्रामपंचायत व देवस्थान संस्थानने पर्यायी व्यवस्था करावी व प्रत्येक विभागाने आपला एक प्रतिनिधी पोलीस नियंत्रण कक्षाजवळ ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
यात्रेत हॉटेल व्यावसायिकांनी वाणिज्य गॅस सिलिंडरचा उपयोग करावा. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार खैरनार यांनी दिला. जीवन प्राधिकरणाच्या वतीने यात्रा काळात उपलब्ध असणारे पिण्याच्या पाण्याचे टॅँकर भरून दिले जाणार असल्याची माहिती अभियंता एस. आर. पवार यांनी दिली. यावर्षी प्रथमच वडांगळीसह १४ गाव पाणीपुरवठा योजना करणाऱ्या तलावात पाणी सोडण्यात आले आहे. सदर तलाव यात्रा स्थळाजवळ असून, त्यात पुरेसा पाणीसाठा आहे.
देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मंदिर परिसरात रुग्ण तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका असणार आहे.
यात्राकाळात घाण व
दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी भाविकांना फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी तंटामुक्त गाव
समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, नामदेव खुुळे, पोपट सैद, दिनकर खुळे, डॉ. आर. एस. लंघे, संस्थानचे अध्यक्ष अशोक चव्हाण, रवि देशमुख, नितीन परदेशी, ग्रामसेवक एस. एस. धीवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)