दोडीत छावण्या सुरू करा
By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T20:34:53+5:302014-06-27T00:16:49+5:30
दोडीत छावण्या सुरू करा

दोडीत छावण्या सुरू करा
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात सलग चौथ्या वर्षीही पाऊस नसल्याने चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचविण्यासाठी तालुक्यातील दोडी परिसरात जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी दोडीचे सरपंच एकनाथ आव्हाड यांनी केली आहे.
शासनाने सिन्नर टंचाईग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. तालुक्यातील पीक आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. सलग तीन वर्षांपासून पाऊस झाला नसल्याने तीन वर्षांतील खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगाम जवळपास वाया गेले आहेत.
धरणे, बंधारे व विहिरींसह सर्वच पाण्याचे स्रोत कोरडेठाक झाले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतीसाठी सोडाच; परंतु पिण्यासाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने पशुधन वाचविण्यासाठी तालुक्यात चार ते पाच ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांकडील चारा संपुष्टात आला असून, सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांकडील चारा शिल्लक रहाणार नाही. पुढील काही दिवसांत पाऊस पडल्यावर खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना बैलांना जास्तीच्या चाऱ्याची गरज भासते. परंतु विकत चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने शेतकरी पशुधन सांभाळण्यासाठी चारा कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)