‘भावडबारी’त सुरक्षा कठडे बांधण्यास प्रारंभ
By Admin | Updated: May 21, 2014 00:10 IST2014-05-21T00:10:24+5:302014-05-21T00:10:24+5:30
भावडबारी घाटातील वाहतूक सुरक्षा कठडे व मार्गदर्शक फलकाअभावी असुरक्षित बनल्याचे वृत्त

‘भावडबारी’त सुरक्षा कठडे बांधण्यास प्रारंभ
‘भावडबारी’त सुरक्षा कठडे बांधण्यास प्रारंभरेडगाव खुर्द : विंचूर-प्रकाशा या राज्य महामार्ग क्रमांक ७ वरील चांदवड-देवळा दरम्यानच्या भावडबारी घाटातील वाहतूक सुरक्षा कठडे व मार्गदर्शक फलकाअभावी असुरक्षित बनल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसांत कठडे बांधण्यास प्रारंभ झाला आहे. विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील भावडबारी घाट हा चांदवड देवळ्याच्या सरहद्दीवर असून, दोन्ही तालुक्यांचा एक विधानसभा मतदारसंघ आहे. तसेच प्रांत कार्यालय चांदवड येथे आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामानिमित्त ये-जा करावी लागते. विविध कारणांनी या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवजड वाहनाची संख्यादेखील गेल्या काही वर्षांत वाढली आहे. सदरचा घाट रस्ता इंग्रजीतील उलट व्ही आकाराचा असून, काहीसा नागमोडी वळणाचा आहे. ठिकठिकाणी तीव्र उतार असून, या ठिकाणी गतिरोधक नाही. साधारण अडीच कि. मी. घाट रस्त्यादरम्यान बहुतांशी ठिकाणी सुरक्षा कठडे नाहीत, रात्रीच्या वेळी रस्त्याची सीमारेषा येण्यासाठीचे रिफ्लेक्टर व मार्गदर्शक फलक नसल्याने येथील वाहतूक असुरक्षिततेच्या खोल गर्तेत सापडलेली आहे. तसेच मंगरूळपासूनचा हा रस्ता बीओटी अंतर्गत केल्याने देवळ्याकडे जाताना घाटाच्या सुरुवातीलाच राज इन्फ्रास्ट्रक्चरचा टोल वसुली नाका आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या असुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे टोल देऊनही घाट रस्त्यादरम्यान जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत राज इन्फ्रास्ट्रक्चर समूहाने सुरक्षा कठडे बांधण्यास प्रारंभ केला आहे. घाट रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक व रिफ्लेक्टरच्या ठिकाणी रेडियम पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व उपाययोजना बाकी असून, थोड्याच दिवसांत त्या संबंधित यंत्रणा सोपस्कार न करता पूर्ण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)