स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?
By Admin | Updated: October 9, 2015 00:18 IST2015-10-08T23:34:01+5:302015-10-09T00:18:55+5:30
तीन कोटींचा केला ठेका रद्द

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?
नाशिक : नुकत्याच झालेल्या सिंहस्थ कुंभमेळादरम्यान साधुग्राममधील महापालिकेच्या ठेक्याबाबत ई-निविदा पद्धतीबाबत मोहोळ उठल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या तीन कोटी रुपयांच्या सौर पथदीप खरेदीचा ठेकाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील जवळपास ३०० ग्रामपंचायतींमध्ये सौर पथदीप पुरवठा करण्याची योजना असून, त्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच दरकरार पद्धतीने राजस्थानच्या एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. प्रत्यक्षात राजस्थानच्या जयपूरस्थित संबंधित कंपनीने वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने पाच महिन्यांनंतर या कंपनीचा दरकरार संपुष्टात आणून नव्याने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांतील व महाराष्ट्रातील पाच बड्या कंपन्यांनी यासाठी स्पर्धा केली. त्यात गुजरात स्थित एका कंपनीने चक्क अंदाजपत्रकीय रक्कमेच्या २८ टक्केन्यूनतम दराने निविदा भरल्याने याच कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा ठेका मिळणार हे जवळपास नक्की झाले. त्यामुळेच इतक्या कमी दराने कसा ठेका परवडणार, त्याला गुणवत्ता राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठेका पुन्हा रद्द करण्याचा ठराव झाला. मुळात स्थायी समितीला ५० लाखांपर्यंत कामे मंजूर करण्याचा अधिकार असताना चक्क तीन कोटींचा ठेका कसा रद्द होऊ शकतो? शिवाय कंपनीने २८ टक्केन्यूनतम दराने ठेका भरल्याने जिल्हा परिषदेला २२,४७५ ऐवजी २७७५ असे किमान ३०० जादाचे पथदीप ग्रामीण भागात बसविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच एका सौर पथदीप खरेदीमागे जवळपास एक हजार रुपये बचत होणार असल्याने चक्क दोन लाख ८० हजारांची जिल्हा परिषदेची बचतही होणार असल्याचे समजते. दुसरीकडे नियमानुसार हा ठेका न्यूनतम दर आलेल्या कंपनीस न दिल्यास संबंधित कंपनी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहेत. (प्रतिनिधी)