नाशकात पेरण्या संकटात !
By Admin | Updated: July 7, 2014 00:20 IST2014-07-06T00:44:19+5:302014-07-07T00:20:56+5:30
जून महिनाही गेला कोरडाच : धरणांत जलसाठा जेमतेम

नाशकात पेरण्या संकटात !
गणेश धुरी
नाशिक
अगदी ७ जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे.
गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये १० ते १५ टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास २ जुलैपर्यंत मागील वर्षी २४९ मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा २८.७५ मि.मी. इतकाच झाला आहे. पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन ४०
हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत.
लांबलेल्या पावसाने कापूस, मका
या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे
क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली
आहे.
खरिपाच्या पेरण्यांवर संकट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही ४४४ हेक्टर क्षेत्रावरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे.
कमी झालेली सरासरी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी १ जून ते २ जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच २८४ मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी १ जून ते २ जुलै यादरम्यान अवघा ४३१.३ मि़मी़ पाऊस झालेला आहे़ मागील वर्षी याचदरम्यान तब्बल ३७४०.५ मिलिमीटर इतका झाला होता.
वार्षिक सरासरीच्या २८ टक्के
जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०१३.३९ इतकी असताना, २ जुलै २०१३ ला २४९.३७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोेंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या १ जून ते २ जुलै दरम्यान पावसाची अवघी २८.७५ मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.
कापूस, मका घटणार
पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यातही तूर आणि भुईमूग पिके खरिपात लवकर पेरणी होत असल्याने ही पिके गेल्यात जमा आहेत. पाऊस लांबल्याने कापूस व मका या प्रमुख पिकांच्या क्षेत्रात मोठी घट होणार असून, बाजरीचे क्षेत्र त्यामुळे वाढणार आहे.