नाशिक : संवादिनीतून पाझरणारे ‘पुरिया कल्याण’ रागाचे स्वर अन् त्यानंतर रंगलेल्या सुरेल गायनाने रसिकांची सायंकाळ प्रफुल्लित केली. शास्त्रीय संगीताच्या या दुहेरी पर्वणीने कानसेनांना तृप्त केले.शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग, ब्रह्मचैतन्य संगीत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत व षडज्-पंचम् आयोजित ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला आज प्रारंभ झाला. शंकराचार्य संकुलात रंगलेल्या या कार्यक्रमात अनंत जोशी यांनी एकल संवादिनी वादन केले, तर हृषीकेश गांगुर्डे यांनी गायन केले. जोशी यांनी पुरिया कल्याण रागाने वादनाला प्रारंभ केला. त्यानंतर ‘भिन्नकंस’ हा नवीन राग तीनतालात पेश करीत त्यांनी रसिकांची दाद घेतली. त्यांना अभय दातार यांनी तबल्यावर साथ केली. दुसऱ्या सत्रात हृषीकेश गांगुर्डे यांनी गायन केले. त्यांना संदीप आपटे व अभय दातार (तबला) यांनी साथ दिली. कार्यक्रमात वैष्णवी भडकमकर व ईश्वरी दसककर यांना शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल यांच्या हस्ते ब्रह्मचैतन्य संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रारंभी गिरीश भगूरकर, रमेश देशमुख, पुरुषोत्तम गांगुर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नंदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
संवादिनीचे स्वर, गायनाचा निर्झर
By admin | Updated: January 23, 2016 23:32 IST