फटाक्याच्या आवाजाने बिबट्या पळाला... उसाचे शेत जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:28+5:302021-02-13T04:15:28+5:30
भगूर: उसाच्या शेतात शिरलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके पेटविले मात्र त्यामध्ये शेतीलाच आग लागल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे ...

फटाक्याच्या आवाजाने बिबट्या पळाला... उसाचे शेत जळाले
भगूर: उसाच्या शेतात शिरलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके पेटविले मात्र त्यामध्ये शेतीलाच आग लागल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. भगूरपासून जवळच असलेल्या राहुरी गावात ही घटना घडली.
राहुरी गावातील शेतकरी वसंत सांगळे, शरद आव्हाड, संतोष सानप यांच्या उसाची दुपारी तोडणी सुरू होती. शेतामध्ये मजूर काम करीत असताना अनेकांना शेतामध्ये बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे सावध झालेल्या मजूर आणि शेतकऱ्यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी लागलीच फटाके पेटविले. फटाक्याच्या आवाजाने बिबट्या पळून लावण्यासाठी चारही बाजूंनी फटाक्यांचा आवाज करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मोठमोठ्या फटाक्यांच्या आवाजाने बिबट्या पळून गेला मात्र त्यानंतर काही वेळातच शेतपिकांनी पेट घेण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी आगीचा धूर निघू लागला आणि आजूबाजूच्या तीन शेतांमध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या आगीत अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. यावेळी संपत घुगे, भाऊसाहेब आव्हाड, संदीप घोरपडे, संजय भाऊ कराड, भरत आव्हाड,यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
कोट :-
ऊसतोडणी वेळी बिबट्या दिसताच वन विभागाला भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आले. तलाठी, कृषी अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. मात्र वेळेत मदत मिळाली नाही. शेवटी स्थानिकांच्या मदतीनेच आग विझविली.
-राहुरी सरपंच सुनीता घुगे व सदस्य संपत घुगे