एकीचे बळ : बुजलेला लोंढा नाला पुनरुज्जीवित करून युवकांनी सोडवला शेतीपाण्याचा प्रश्न

By Admin | Updated: August 21, 2014 00:16 IST2014-08-20T22:48:30+5:302014-08-21T00:16:03+5:30

पाण्याच्या वेडात नामपूरचे वीर दौडले आठ

Solidarity: The question of farming by reviving the long hop drains | एकीचे बळ : बुजलेला लोंढा नाला पुनरुज्जीवित करून युवकांनी सोडवला शेतीपाण्याचा प्रश्न

एकीचे बळ : बुजलेला लोंढा नाला पुनरुज्जीवित करून युवकांनी सोडवला शेतीपाण्याचा प्रश्न

शरद नेरकर ल्ल नामपूर
मोसम खोऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना येथील आठ-दहा युवक एकत्र येतात, तहान-भूक विसरून परिसराच्या भल्यासाठी राबराब राबतात, पदरमोड करतात व बुजलेला पूर्वीचा लोंढा नाला पुनरुज्जीवित करून परिसरातील ७०० एकर बागायत क्षेत्र जिवंत करतात ही गोष्ट सोपी नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या वेडाने झपाटलेल्या युवकांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी आदर्श असे काम उभे केले आहे.
पूर्वी ऐतिहासिक नोंद असलेला लोंढा नाला नामपूर येथील फळबागायतीतून जात होता. अतिवृष्टी, अतिक्रमण व महापूर यांच्या तडाख्यात हा बुजला गेला. या नाल्याचे कुठलेही नामोनिशाण या ठिकाणी नव्हते. परंतु पाणीप्रश्नाची तीव्रता जाणवू लागल्यावर पाणी कुठून उपलब्ध करावे हा निर्वाणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. या साऱ्या गोष्टींचा विचार करून नामपूर येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र सावंत, बिपीन सावंत, अन्नू देसले, जयदीप सावंत, कृष्णा भावसार, भाऊसाहेब सावंत, योगेश चौधरी, रोहित सावंत यांनी एकत्र येऊन लोंढा नाला विकासाची चर्चा केली. शेतीला कितीही विक्रीचे पाणी घेतले तरी ते शेतीस पुरेसे नसते. त्याऐवजी जर पाण्यावर पैसे देण्यापेक्षा हा पैसा जर लोंढा नाला खोदाई व दुरुस्तीसाठी वापरला तर? यासाठी ११ युवक एकत्र आलेत. वडीलधाऱ्यांचा याबाबत सल्ला घेतला. सर्वांच्याच तोंडून होकार आला. काम तर मोठे होते पैसा भरपूर लागणार होता. पैसा उपलब्ध करायचा कसा? मात्र प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणून कामाचा श्रीगणेशा केला. अनेक विहिरी मालक शेतकऱ्यांनीसुद्धा या प्रकल्पात स्वत:हून मदत दिली. सुरुवातीला गैरसमजातून विरोध करणाऱ्यांनी अखेर या कामासाठी फक्त वेळच नाही तर आर्थिक मदतीचाही हात पुढे केला.
लोंढा नाला हा तसा मोसम नदीतून खामलोण शिवारापासून सुरू होतो. मात्र या युवकांनी हा नाला साक्री रस्त्यापासून सुरू केला, तर तो बिजोरसेजवळ मोसम नदीत येऊन मिळतो. मात्र साक्री रस्त्यापासून येणारे हे पूरपाणी पुन्हा मोसमनदीलाच जाऊन मिळते. हिरव्या शेतीचे स्वप्न बघणाऱ्या या युवकांना अनेकांचे सहकार्य मिळाल्याने हा नाला आता तब्बल दोन कि. मी. एवढा झाला आहे. हा नाला ३५ फूट रुंद व १५ फूट खोल असून, लांबी दोन कि.मी. पर्यंत आहे. हरणबारी धरण भरले त्याचे पूरपाणी मोसम पात्रात आले हे पूरपाणी या नवयुवकांनी लोंढा नाल्यात वळवले, पुन्हा हे पूरपाणी मोसम मातेच्या पात्रात येऊन सोडले. तरीही या पाण्याचा फायदा ७०० ते ८०० एकराला होऊन बिजोरसे गावाच्या पाणीपुरवठा योजनेस यामुळे संजीवनी मिळणार आहे.
या प्रकल्पात या युवकांनी मातीचे बांध बांधले आहेत. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे हे बांध फुटतात व पाण्याचे नुकसान होते. मात्र या प्रकल्पात शासनाने सात ते आठ साखळी बंधाऱ्यासाठी निधी (सीमेंटचे) दिला तर पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर परक्युलेशन होणार आहे.

Web Title: Solidarity: The question of farming by reviving the long hop drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.