भय ‘तिथले’ संपण्याची चिन्हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:51 AM2019-08-15T00:51:24+5:302019-08-15T00:53:14+5:30

आम्ही ज्यावेळी काश्मीरला गेलो, त्यावेळी मनात कायम अनामिक भीती होती. मात्र, ३७० रद्द झाल्याने तेथील वातावरण भविष्यात भयमुक्त होण्याची अपेक्षा असून, अशा भयमुक्त वातावरणात पुन्हा एकदा काश्मीरचा स्वर्ग अनुभवण्याची इच्छा असल्याचा सूर यापूर्वी काश्मीरला जाऊन आलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी व्यक्त केला.

Signs of the 'end' of fear ... | भय ‘तिथले’ संपण्याची चिन्हे...

भय ‘तिथले’ संपण्याची चिन्हे...

Next

नाशिक : आम्ही ज्यावेळी काश्मीरला गेलो, त्यावेळी मनात कायम अनामिक भीती होती. मात्र, ३७० रद्द झाल्याने तेथील वातावरण भविष्यात भयमुक्त होण्याची अपेक्षा असून, अशा भयमुक्त वातावरणात पुन्हा एकदा काश्मीरचा स्वर्ग अनुभवण्याची इच्छा असल्याचा सूर यापूर्वी काश्मीरला जाऊन आलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे राज्य बनवत तेथील कलम ३७० रद्द करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वाटत असल्याचे मत बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले. पूर्वीच्या पर्यटनप्रसंगी आलेल्या दडपणाचे अनुभव विसरून भीतीचा लवलेश नसलेले काश्मीर पर्यटन करायला मिळावे, अशी अपेक्षा असल्याचे मत बहुतांश पर्यटकांनी व्यक्त केले आहे.
काश्मीरमध्ये पुन्हा नंदनवन फुलेल
जम्मू-काश्मीरला एरव्ही पर्यटक जात होते, परंतु पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास ९८ टक्के पर्यटकांनी जिवाच्या भीतीने जम्मू-काश्मीरकडे पाठ फिरविली. लाखो रुपये खर्च करूनही जर पर्यटनस्थळाचा मोकळ्यापणाने आनंद लुटता येणार नसेल व दहशतवाद्यांची भीती अवतीभोवती घोेंगावत असेल तर न गेलेलेच बरे अशी पर्यटकांची भावना निर्माण झाली होती. आता मात्र केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीर आपले आहे, असे पर्यटकांना वाटू लागेल व स्थानिक नागरिकांनाही पर्यटक आपले आहेत, असे वाटेल; परंतु त्यासाठी वेळ लागेल. या चार-सहा महिन्यांत दहशतवादी कृत्याचा पूर्णत: बीमोड झाला, तर मात्र काश्मीरमध्ये पुन्हा नंदनवन फुलेल.
- ब्रिजमोहन चौधरी, टूर व्यावसायिक
वर्षभरानंतर वातावरण निवळण्याची शक्यता
काश्मीरला जाणे आणि तेथील निसर्ग पाहण्याचा आनंद मिळवणे किंवा तेथील सौंदर्याचे वर्णन शब्दांमध्ये करणेच शक्य नाही. मात्र, तेथील प्रवासात सतत मनावर भीतीचे सावट असायचे. काश्मीरमध्ये संचारबंदीमुळे आमचेदेखील ३ दिवस वाया गेले होते. तसेच आजूबाजूचे एटीएमदेखील बंद असल्याने जवळ फारसे पैसे नसताना दिवस काढावे लागले. आता ३७० कलम रद्द झाल्यामुळे तिथे येत्या वर्षभरात वातावरण निवळण्याची शक्यता वाटते. तसेच तिथे चांगली हॉटेल्सदेखील होतील. त्यामुळे भविष्यात पुन्हा काश्मीरचे स्वर्गीय सुख अनुभवायला आवडेल.
- संदीप कोकाटे
अगर फिरदौस वरू-ई-जमीं अस्त, हमी अस्त, हमी अस्त..
काश्मिरी भाषेत पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे असे म्हटले जाते. दोन महिन्यांपूर्वी काश्मीरला सहपरिवार पर्यटनाला जाण्याचा योग आला. निवडणुकांच्या निकालानंतरचे काश्मीर आणि त्या अगोदरचे काश्मीर यामध्ये लक्षणीय फरक जाणवत होता. त्यावेळेसच ३७०वे कलम रद्द केले जाणार याविषयी स्थानिक लोकांना खात्री वाटत होती. नशिबाने सर्व दौरा आटोपून शेवटच्या टप्प्यात पहेलगाम परिसरात असल्याने श्रीनगर शहरातील कर्फ्यूचा परिणाम या भागात नव्हता. त्यातही रमजानचे दिवस असल्याने काश्मीर जनतेशी मनमोकळा संवाद साधता आला. येथील जनतेसाठी पर्यटक महत्त्वाचे असल्याने पर्यटकांना तसा काही त्रास होत नाही. पर्यटकांना देव मानणारा काश्मिरी कफल्लकच राहिला आहे. आता या निर्णयामुळे काश्मिरी जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्यातील गैरसमज दूर करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. खरे स्वातंत्र्य त्यांना कळले तर नंदनवन अधिकच फुलेल. - डॉ. स्वप्नील तोरणे
भीतीचे वातावरण कमी होणार
जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जातो. एक पर्यटक म्हणून आणि टूर्स संचालक म्हणूनदेखील कायम मनात भीती असायची. पर्यटनस्थळी गेल्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असायची. काहीवेळा तर जम्मू-काश्मीरला जाऊन अमरनाथला जाणाऱ्या भाविकांनादेखील परत येण्याची वेळ आली होती. परत येतानादेखील भाविक आणि पर्यटकांच्या मनात भीतीचे सावट असे. अनेक तास त्यांना गाड्यांची वाट पाहत स्टेशनवर थांबावे लागत होते. परत दिल्लीला पोहोचेपर्यंत ही भीती मनात कायम असे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. मी स्वत: या गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. आता राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसते. आम्ही पुन्हा नोव्हेंबरमध्ये काश्मीरमध्ये जाणार आहोत. तेव्हा पूर्वीच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात निश्चित फरक असेल.आता पर्यटन व्यवसाय वाढल्यास त्यांच्या स्थानिक व्यवसायालादेखील चालना मिळणार आहे.
- मिलिंद भालेराव, टूर व्यावसायिक
पर्यटन विकासाचा मार्ग खुला
काश्मीर खरेच भारताचे नंदनवन आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, डल झील, अमरनाथ यात्रा, कारगिल, द्राससह लेह-लडाख या भागात २०१८ साली पर्यटन केले. त्यावेळी आमच्याही मनात भीती होतीच. काश्मिरी जनतेला पर्यटकांविषयी आपुलकी असल्याचे आम्हाला प्रकर्षाने जाणवले. काश्मीर खोºयात स्थानिक जनतेला शैक्षणिक, आरोग्याच्या बाबतीत जाणवणाºया उणिवा दूर होण्यास कलम ३७० हटविल्यामुळे मदत होणार आहे. पर्यटन हाच त्यांचा जीवनाचा आधार असून, हा आधार आता अधिक भक्कम होईल. पर्यटन विकासासाठी येथे मोठा वाव असून कलम ३७० रद्द झाल्याने त्यास चालना मिळेल.
- संगीता व सुनील खोडे, नागरिक, खोडेनगर

Web Title: Signs of the 'end' of fear ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक