पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे श्रावणाचे नियोजन कोलमडणार
By Admin | Updated: July 21, 2014 00:44 IST2014-07-20T22:34:34+5:302014-07-21T00:44:03+5:30
पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे श्रावणाचे नियोजन कोलमडणार

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे श्रावणाचे नियोजन कोलमडणार
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या (दि. २८) पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यास शहरातील नियोजन कोलमडण्याची शक्यता नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांनी व्यक्त केली
आहे.
त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण श्रावण महिन्यात शिवभक्तांची गर्दी असते. या काळात लाखो भाविक त्र्यंबकला येऊन जातात. साहजिकच यावेळचे नियोजन आराखडे तयार करूनच केले जाते. नेमके हीच वेळ साधून कर्मचारी संपावर गेल्याने श्रावण मासारंभाचे कसे नियोजन करावे, असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे पडला आहे. त्र्यंबकचा पाणीपुरवठा दोन दिवसांआड करावा लागला आहे. तथापि, अंबोली जलाशय भरला आहे. जलपूजन करण्यात आले. त्यावेळीदेखील पाणीपुरवठा अभियंता, कर्मचारी गैरहजर होते. श्रावण महिन्यात लाखो भाविक येत असल्याने पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था कशी लावता येईल. या संबंधात पालिकेने शासनाकडे पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती दाखवून दिली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलीस, बससेवा, आरोग्य, वीज वितरण आदिंचे आराखडे तयार आहेत. नगरपालिकेचा आराखडा अद्याप तयार नाही. (वार्ताहर)