नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:37+5:302021-04-15T04:13:37+5:30
सिन्नर: नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदुरशिंगोटे गट व ...

नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई
सिन्नर: नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदुरशिंगोटे गट व गणातील विहिरींची भूजल पातळी खालावली असून, ठिकठिकाणी बंधारे पूर्णतः कोरडे झाले आहेत. भोजापूर धरणात अजूनही पुरेसा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे केली आहे. याबाबत दीपक बर्के यांनी मागणीचे पत्र दिले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांनी सभापती बर्के यांना याबाबत सूचना केली होती. परिणामी, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे भोजापूर परिसरातील गावांना कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी सभापती बर्के यांनी केली आहे.
नांदुरशिंगोटेसह कणकोरी, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, खंबाळे, माळवाडी, पांगरी आदी ११ गावांतील बंधारे भरण्याची मागणी करण्यात आली. कालव्याद्वारे पाणी सोडून बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
--------------------
१३५ दलघफू साठा शिल्लक
धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, यंदा भोजापूर धरणात १३५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अजूनही शिल्लक आहे. धरण बांधल्यानंतर प्रथमच भर उन्हाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दरवर्षी जेमतेम दोन ते तीन टक्के पाणीसाठा शिल्लक राहतो. धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांचा विचार केला, तरी त्यांच्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडले, तरी त्याचा पाणीपुरवठा योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. उन्हाळी आवर्तन सोडल्यास धरणाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तन सुटणार आहे.
----------------------
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र तहसीलदार राहुल कोताडे देताना दीपक बर्के. (१४ सिन्नर १)
===Photopath===
140421\14nsk_25_14042021_13.jpg
===Caption===
१४ सिन्नर १