सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने राहाणार खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:06+5:302021-06-01T04:12:06+5:30
नाशिक : जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ८.११ टक्के तसेच ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी वापरात असल्याने जिल्ह्याला लागू ...

सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने राहाणार खुली
नाशिक : जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ८.११ टक्के तसेच ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी वापरात असल्याने जिल्ह्याला लागू असलेले निर्बंध १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर हॉटेल्स आणि मद्य दुकानांवर असलेले निर्बंध कायम असून, त्यांना केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्नसोहळ्याला असलेले निर्बंधदेखील पूर्वीप्रमाणेच कायम राहाणार आहेत.
नाशिक जिल्हा रेड झोनमधून बाहेर आल्याने जिल्ह्याला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्वप्रकारची दुकाने खुली होणार आहेत. यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. आता सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना त्यामध्ये मेडिकल, दवाखाने, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच परवानगी असेल तर त्यानंतरच्या धार्मिक विधींसाठी केवळ १५ जणांना असलेली परवानगी कायम आहे. लग्नसोहळ्यांना असलेली बंदी कायम असून, केवळ नोंदणी विवाहांनाच परवानगी असणार आहे. मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे, व्यायामशाळा, सभागृहे लॉन्स, मंगल कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच राहाणार आहेत.
शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती २५ टक्के इतकी असणार आहे. कृषिक्षेत्रांशी संबंधित दुकानांना वेळ वाढवून देण्यात आली असून, सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत त्यांची दुकाने सुरू राहाणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले.
हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, ढाबे यांना केवळ होम डिलिव्हरीलाच परवानगी असेल. त्यांना दुकाने सुरू करता येणार नाही. सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ते पार्सल सुविधा पुरवू शकणार आहेत. बँका, पोस्ट कार्यालयांचा व्यवहार हा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहील. मुद्रांक नोंदणीचे कार्यालय नियमाप्रमाणे सुरू राहाणार आहे.
--इन्फो-
हे राहाणार सुरू (निर्बंधासह)
सलून, सराफ दुकाने,
कृषिविषयक आस्थापना
दूध विक्री
शासकीय कार्यालये
भाजी विक्री
रेशन दुकाने
बँका, पोस्ट
मुद्रांक कार्यालये
अत्यावश्यक सेवेतील आस्थापना
--इन्फो--
हे राहाणार बंद
मद्य दुकाने, हॉटेल्स, फूड मॉल्स, मिठाई दुकाने, ढाबे, हॉटेल्स
सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा
सभागृहे, मंगल कार्यालये
लॉन्स, स्पा, मॉल्स, मल्टिप्लेक्स
जलतरण तलाव, उद्याने, शाळा, महाविद्यालये, क्लासेस, सार्वजनिक वाहतूक
--इन्फो--
दुपारी ३ नंतर बाहेर फिरण्यास मनाई
निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सक्षम कारण असेल तर त्यासंदर्भातील पुरावा सादर करावा लागणार आहे. दर रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीत नाइट कर्फ्यू असणार आहे.
--इन्फो--
दर शुक्रवारी होणार आढावा
शासनाच्या आदेशाप्रमाणे दर शुक्रवारी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. सद्य:स्थितीत पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेले आहेत. दुर्दैवाने पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर पुन्हा या शिथिलतेचा फेरविचार केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळून संयमाने व्यवहार करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
--कोट--
..तर पुन्हा निर्बंध येतील
जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. विनाकारण गर्दी करणे, नियमांचे पालन न करता बेफिकिरी दाखविली आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर पुन्हा निर्बंध येतील. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- छगन भुजबळ, पालकमंत्री