मेंढीपाडे परिसरातील शेतकरी अंधारात
By Admin | Updated: July 11, 2014 00:54 IST2014-07-10T23:01:46+5:302014-07-11T00:54:17+5:30
मेंढीपाडे परिसरातील शेतकरी अंधारात

मेंढीपाडे परिसरातील शेतकरी अंधारात
जायखेडा : लगतच्या एकलहरे, जयपूर (मेंढीपाडे) वाडीपिसोळ व नांदीन शिवारातील शेतकऱ्यांना तासन्तास अंधारात रहावे लागत असल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात सिंगल फेजद्वारे वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून येथील शेतकरी वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
वारंवार निवेदने देऊन व आंदोलने करूनही या भागातील शेतकऱ्यांना सिंगल फेज योजनेचा लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भागात सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता आर.पी. महाजन यांना पुन्हा निवेदने देऊन सिंगल फेज योजना मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
जायखेडा नदीपल्याडच्या एकलहरे, जयपूर (मेंढीपाडे) वाडीपिसोळ व नांदीन या गावांतील शेती शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बागायती शेती असल्याने अनेक शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह शेतातच वास्तव्य करतात; मात्र विजेअभावी तासन्तास या शेतकऱ्यांना अंधारात रहावे लागत आहे. अंधारामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात मोठ्या अडचणी येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे. अंधाराचा फायदा घेत चोरटे छोट्या-मोठ्या चोऱ्या करतात. डाळींब फळांबरोबरच अन्य पिकांची व शेती उपयोगी साहित्याच्या चोऱ्या वाढल्या आहेत. येथून पिसोळ किल्ला जवळच असल्याने या परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. अंधाराचा फायदा घेत बिबट्याही पाळीव प्राण्यांवर हमला करून त्यांचा जीव घेत आहे. अशा स्थितीत एखाद्या शेतकऱ्यावरही बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात त्वरित सिंगलफेज विद्युतपुरवठा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. इतर अनेक शेतशिवारात सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना वारंवार मागणी करूनही एकलहरे, जयपूर, वाडीपिसोळ व नांदीन शिवारातील शेतकऱ्यांना जाणूनबुजून या योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सिंगल फेज योजना या भागात कार्यान्वित व्हावी यासाठी धनसिंग सूर्यवंशी, पंकज सोनवणे, मयूर नेरकर, योगेश सोनवणे, आबा अहिरे, गुलाब देवरे, अनिल शिंदे, रतन नेरकर, प्रेमसिंग सूर्यवंशी, राकेश शिंदे, हरीश नेरकर, नीलेश देवरे व परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा निवेदन देऊन सिंगल फेजची मागणी केली आहे. (वार्ताहर)