शरयूनगर अद्यापही रस्त्याच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 2, 2015 23:09 IST2015-08-02T22:58:20+5:302015-08-02T23:09:56+5:30
कच्चा रस्ता : नागरिकांना तुडवावा लागतो चिखल

शरयूनगर अद्यापही रस्त्याच्या प्रतीक्षेत
इंदिरानगर : परिसरातील शरयूनगर येथे गेल्या पंधरा वर्षांपासून कच्चा रस्ता असून डांबरीकरण केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी कच्चा रस्ता असल्याने नागरिकांना चिखल तुडवत जावे लागते, शिवाय रिक्षा आणि अन्य वाहने चिखलात जात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रहिवाशांचा हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जपुरवठा करून त्या माध्यमातून जीआय योजनेअंतर्गत शरयूनगर गृहनिर्माण योजना साकारण्यात आली आहे. २००१ मध्ये या गृहनिर्माण योजनेचे बांधकाम सुरू झाले. सध्या याठिकाणी २९० घरे आहेत. येथील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्याला जोड रस्ता तयार करण्याची जबाबदारी विकासकाने पार पाडली नाही आणि अन्य शासकीय, निमशासकीय यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ रस्ताच नाही तर याठिकाणी सांडपाणी निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
येथील दोन प्रभागांच्या हद्दीत समावेश असल्याच्या प्रशासन आणि नगरसेवकांच्या दाव्यामुळे या भागाला कोणीही वाली उरलेला नाही. परिणामी गेल्या पंधरा वर्षांपासून नागरिक रस्ते आणि चिखल या समस्येने त्रस्त आहेत. आधीच कच्चा रस्ता, त्यात दगड-गोटे वर आलेले आणि सध्या सुरू असलेला पाऊस यामुळे कच्च्या रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे या रस्त्यावरून जाताना मोठे हाल होतात. वाहन घसरण्याच्या प्रकारामुळे अपघात होतात. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी असलेली रिक्षा, व्हॅनसारखी वाहने याठिकाणी चिखलात फसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखल तुडवत मुख्य रस्त्यावर यावे लागते. पावसाळा सुरू झाला की ही समस्या दरवर्षी भेडसावत असते.
एकीकडे महापालिकेकडून कुंभमेळ्यासाठी शहरात पाचशे कोटी रुपये त्याच त्या मार्गावर डांबरीकरण करण्यासाठी खर्च केले जात असताना दुसरीकडे मात्र शरयूनगरवासीयांना आपण शहरात राहात आहोत की ग्रामीण भागात असा प्रश्न पडतो. याठिकाणी बहुतांशी सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, पालिका त्याकडे कधी लक्ष पुरवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)