एकनाथ सावळा
मेशीमेशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने मेशीसह पाच गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. ऐन पावसाळ्यात परिसरास टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चून उभी केलेली ही योजना धूळ खात पडून आहे. त्यामुळे ही मेशी प्रादेशिक पाच गाव नळपाणी-पुरवठा योजना असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. या योजनेंतर्गत मेशी, वासोळ, महालपाटणे, रणदेवपाडा, डोंगरगाव या गावांसाठी शासनाने १९९८ साली सुमारे सात कोटी रुपये मंजूर करून ही योजना २००५मध्ये जलशुद्धीकरण केंद्रासह पूर्ण झाली. मात्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाने योजनेत त्रुटी असल्याचे दाखवून जिल्हा परिषदेकडे योजना हस्तांतरित केली नाही. ही योजना पूर्ण होऊन जेमतेम दोन-तीन महिनेच सदर गावांना पाणी मिळाले. या योजनेला देखभालीसाठी, दुरुस्तीसाठी शासनाकडून कुठलाही निधी प्राप्त होत नसल्याने तसेच विद्युत मंडळाची एक लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही योजना १७ आॅगस्ट २००५ पासून आजपावेतो बंद आहे. याचा परिणाम योजनेतील समाविष्ट गावांना आज पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.या योजनेतील मेशी हे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. याशिवाय मेशी व डोंगरगाव या दोन गावांनाच गिरणा पात्रातील केटीवेअर शिवाय दुसरा जिवंत जलस्रोत नाही. परिणामी मेशी, डोंगरगाव, रणदेवपाडे या गावांना दरवर्षी फेब्रुवारीपासूनच टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे एक तर शासनाने पर्यायी दुसरी योजना करावी किंवा ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. १६ जुलै २०१२च्या शासन निर्णयानुसार बंद पडलेल्या पाणीयोजना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. मेशी व वासोळ या गावांनी योजना सुरू व्हावी यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव दिलेले आहेत.