बागलाण तालुक्यात लष्कराची पेटी सापडल्याने खळबळ
By Admin | Updated: September 26, 2016 01:09 IST2016-09-26T01:08:52+5:302016-09-26T01:09:13+5:30
सहा जण ताब्यात : शस्त्रे असण्याची शक्यता; लष्कराचे अधिकारी दाखल

बागलाण तालुक्यात लष्कराची पेटी सापडल्याने खळबळ
सटाणा : तालुक्यातील किकवारी येथे एका मक्याच्या शेतात भारतीय लष्कराची सीलबंद पेटी सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पेटीत शस्त्रास्त्रे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शनिवारी रात्रीपासून सटाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे
शाखेच्या पोलिसांच्या टीमने या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान संरक्षण मंत्रालयाचे तीन अधिकारी सटाण्यात दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सटाणा शहरात येणार आहेत. त्यानंतरच या पेटीत काय आहे ते स्पष्ट होणार आहे.
सटाण्याचे सहायक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील किकवारी शिवारात एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात भारतीय लष्कराचे आणि अशोकचक्र असलेली मोठी पेटी मिळाली असून, त्यावर अत्यंत गोपनीय शिक्का असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमसह गोपनीय तपासाला सुरवात केली.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कळवून त्यांचीही मदत घेण्यात आली.
रात्रभर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमने जंगजंग पछाडून पाच जणांसह तो पेटारा ताब्यात घेतला आहे.या पेटारावर डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च आण िडेव्हलपमेंट लेबोरेटरी) चा शिक्का आहे.हे पेटारे सबंधित विभागाच्या शास्रज्ञाशिवाय उघडू नये व त्याच्या जवळ कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये अशा सूचना इंग्रजी मध्ये दिल्याने कोणत्याही पोलीस अधिकार्याने अथवा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी या पेटार्या पासून दोन हात लांब राहणेच पसंत केले. शिक्के पाहता प्रथम दर्शनी हा पेटारा बनावट असल्याचा दावा सैन्य दलाच्या अधिकार्यांनी केला आहे.मात्र बॉक्स उघडून पाहण्याचा धोका कोणीही न पत्करल्याने त्या पेटार्याचे गूढ कायम आहे.
सैन्यदलाचे अधिकारी व ताब्यात घेतलेल्या तरु णांची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गोपनीयतेमुळे पोलिसांनी ही नावे उघड केलेली नाहीत.दरम्यान या घटनेमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधान आले असून त्या पेटार्या मध्ये नेमके काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.