तिघा सदस्यांची निवड रद्दबातल
By Admin | Updated: January 9, 2015 00:56 IST2015-01-09T00:37:39+5:302015-01-09T00:56:05+5:30
तिघा सदस्यांची निवड रद्दबातल

तिघा सदस्यांची निवड रद्दबातल
मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समितीच्या तिघा सदस्यांची गेल्या जुलै महिन्यात झालेली निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. तिसरी आघाडीचे गटनेते नरेंद्र सोनवणे यांच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला. त्यामुळे मनपातील संबंधित तिघा सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊन याचिकाकर्ते सोनवणे यांनी सुचित केलेल्या तिघा सदस्यांची निवड होणे क्रमप्राप्त आहे. मात्र या निर्णयामुळे कॉँग्रेसचे विद्यमान स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी यांचे सभापतिपदही धोक्यात आले आहे.
मनपात १६ सदस्यीय स्थायी समिती आहे. गेल्या निवडीच्या विशेष महासभेत नऊ नूतन सदस्यांची निवड करण्यात आली होती.
त्यातील सात सदस्यांची निवड ही मुदत संपुष्टात आल्यामुळे तर वर्षभरातंनर इतरांना संधी मिळावी म्हणून सेनेच्या दोघा सदस्यांची निवड झाली होती.
या निवडणुकीवेळी तत्कालीन १९ सदस्य असलेल्या तिसरा महाज पार्टीचे गटनेता मोहम्मद सुलतान व तिसरा महाज आणि अपक्ष मिळून तयार झालेल्या २३ सदस्यीय तिसरी आघाडीचे गटनेते नरेंद्र सोनवणे यांच्यातील गटनेतेपदाचा वाद गाजला होता. त्यावेळी काँग्रेसने केलेल्या राजकीय खेळीत तिसरा महाज पार्टीचे गटनेता मोहम्मद सुलतान यांना फोडून आपल्या बाजूने वळविले होते. त्यामुळे तिसरी आघाडीचे गटनेते सोनवणे यांनी स्थायीसाठी सुचित केलेल्या सदस्यांच्या नावाचे पाकीट न फोडता तत्कालीन महापौर ताहेरा शेख यांनी सुलतान यांनी सुचित केलेल्या सदस्यांची नावे स्थायी सदस्य म्हणून जाहीर केली. अर्थात, या सदस्य निवडीच्या आधारे त्यानंतर
मनपा स्थायी समिती सभापतिपदी कॉँग्रेसचे अस्लम अन्सारी यांची निवड झाली.
या दरम्यान गटनेता सोनवणे यांनी मनपा स्थायी सदस्य निवडीस न्यायालयात आव्हान दिले. गेल्या महिन्यात मनपाच्या महापौरपद निवडीआधी सुलतान यांच्याऐवजी सोनवणे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याआधारेच मनपात सत्तांतर होऊन कॉँग्रेसला महापौरपद गमवावे लागले. न्यायालयीन निकाल आणि बदलती राजकीय परिस्थिती यामुळे मनपातील स्थायी समिती सभापती कॉँग्रेसचे अस्लम अन्सारी यांचे पददेखील धोक्यात असल्याची मनपा वर्तुळात चर्चा आहे.