भंगार गुदामे धोकादायक
By Admin | Updated: April 4, 2016 23:59 IST2016-04-04T23:57:54+5:302016-04-04T23:59:35+5:30
भीतीदायक : आगींमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता

भंगार गुदामे धोकादायक
इंदिरानगर : वडाळा गावातील प्रभाग क्र. ५४मधील भंगार गुदामे आणि लहान मोठ्या कारखान्यांस लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या भर लोकवस्तीत या भंगार गुदामे आणि कारखान्यास परवानगी नसताना भंगारबाजार कसा वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेतीमध्ये गुलाब, झेंडू आणि द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत होते. परंतु जमिनीस जसजसा भाव मिळत गेला त्याप्रमाणे शेती एकएक करून विकली गेली. गावात सुमारे दहा हजार लोकांची वस्ती आहे. यामध्ये दोन ते तीन झोपडपट्टी आहेत. गावातील काही भागांत गुंठावर पद्धतीने जमिनी विकल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी स्वस्तात जमिनी घेऊन त्या ठिकाणी भंगाराचे गुदामे आणि लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. वाढणारे भंगाराचे गुदामे आणि कारखाने डोकेदुखी ठरत आहे.
फेबु्रवारी, मार्च व एप्रिल महिन्यांत आग लागण्याचे प्रमाण वाढते. आतापर्यंत अनेक वेळा भंगार गुदामे आणि कारखान्यास आग लागली आहे, परंतु अग्निशामक दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु आग लागत असल्याने परिसरातील रहिवाशांना जीव धोक्यात घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. भर लोकवस्तीत भंगार गुदामे आणि कारखाने असतानाही मनपा कोणतीही कारवाई का करत नाही. याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. (वार्ताहर)