कोरोना स्थितीनुसार शाळांचे पूनर्नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:13+5:302021-02-23T04:22:13+5:30

नाशिक : राज्यातील मुंबई, पुण्यासह विदर्भातील शाळा कोरोनाची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन बंद करण्यात आल्या असल्या तरी नाशिक जिल्ह्यात ...

Schools should be rearranged according to corona status | कोरोना स्थितीनुसार शाळांचे पूनर्नियोजन करावे

कोरोना स्थितीनुसार शाळांचे पूनर्नियोजन करावे

नाशिक : राज्यातील मुंबई, पुण्यासह विदर्भातील शाळा कोरोनाची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन बंद करण्यात आल्या असल्या तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप शाळांविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या स्थितीनुसार शाळांचे पुनर्नियोजन करण्याची गरज असल्याचे मत शहरासह जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पाचवी ते आठवी व नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. परंतु, विद्यार्थी व शिक्षकांच्या संख्येसंदर्भात अद्याप कोणतेही सुधारित नियोजन करण्यात आले नव्हते. अशा स्थितीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च मा. विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याविषयी शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यापासूनच शंभर टक्के शिक्षक कार्यरत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले, तर शिक्षण विभागाने शिक्षकांची उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याची गरजही काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

कोट- १

शाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी यापूर्वीचे नियोजन बदलाविषयी अद्याप कोणत्याही सूचना नाहीत; परंतु शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढीव शिक्षकांची आवश्यकता भासत आहे. कोरोनाची बदलती परिस्थिती पाहून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन होणे आवश्यक आहे.

- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो.

कोट-२

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोविड -१९ रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २८ तारखेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर कठोर निर्णयाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या ज्याप्रमाणे शाळा सुरू आहेत, त्याचप्रमाणे शाळा सुरू ठेवून शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याची गरज आहे. कोरोना रुग्ण वाढत असताना शिक्षण विभागाने घाई करून नये.

- मोहन चकोर, अध्यक्ष, शहर माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक

कोट-३

जिल्ह्यात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण आढळून आलेले नाही. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शंभर टक्के शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मर्यादा असल्याने एका वर्गातील विद्यार्थी दोन वर्गांमध्ये विभागले गेल्याने एकाच वर्गासाठी दोन शिक्षकांची गरज भासते. त्यातच शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना शिक्षकांची उणीव भासत होती. अशा स्थितीत शंभर टक्के उपस्थितीचा निर्णय केवळ औपचारिकता आहे.

- गुलाब भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल

पॉईंटर-

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

नववी - १,११,४२१

दहावी - ९८,९५९

अकरावी - ६८,१६०

बारावी - ६७,९१८

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

Web Title: Schools should be rearranged according to corona status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.