आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
By Admin | Updated: June 6, 2016 00:27 IST2016-06-05T22:10:12+5:302016-06-06T00:27:35+5:30
मोफत शिक्षण : जिल्ह्यात १०६ विद्यार्थी

आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
नाशिक : नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील पाल्यांच्या शिक्षणासाठी धर्मदाय संस्था पुढे आल्या असून, सातारा-वाई येथील जनता शिक्षण संस्थेने मोफत शिक्षण देण्याची तयारी दर्शविली, तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना संस्थानने पत्रे पाठवून देऊ केलेल्या मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. साधारणत: १०६ विद्यार्थी पात्र ठरू शकतात. सातारा जिल्ह्यातील वाई येथील जनता शिक्षण संस्थेने अकरावी ते एस.एस.सी.पर्यंत विनाशुल्क शिक्षणाची, निवास, भोजनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात राज्यातील सुमारे २५० विद्यार्थ्यांसाठी ही सोय करण्यात येणार असल्याने त्यासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांनी मागविली आहे. (प्रतिनिधी)