सातगाव योजना दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे
By Admin | Updated: February 14, 2016 23:20 IST2016-02-14T22:01:11+5:302016-02-14T23:20:16+5:30
दिलासा : उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून होणार सुटका

सातगाव योजना दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे
गुळवंच : बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, यामुळे योजनेत सहभागी असणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या महिनाभरात योजना सुरळीत होणार असून, त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
युती शासनाच्या काळात बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. योजनेची सर्व कामे पूर्ण झाली होती. मात्र पाण्याचा उद्भव चुकल्याने
योजना सहा महिन्यात बंद पडली होती. शेवटच्या गावापर्यंत
पाणी पोहचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला होता. २००२ पासून सदर योजना बंद पडली होती.
दुरुस्ती निधीतून निमगाव-सिन्नर, गुळवंच, हिवरगाव व सुळेवाडी या चार गावांना भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार करून नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
नांदूरमधमेश्वर व के.पा.नगर येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम नियोजित असून, नांदूरमधमेश्वर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. केपानगर येथे जागेच्या वादामुळे प्रत्यक्ष कामास विलंब होत आहे.
याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समिती गटनेते उदय सांगळे तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
महिनाभरात बिगर फिल्टरचे पाणी योजनेत सहभागी गावांमध्ये पोहचण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून टॅँकरने पुरवठा सुरू असलेल्या निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री या गावांना योजनेचे पाणी मिळाल्यास ही गावे पाणीटंचाईसह टॅँकरमुक्त होणार आहेत. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा परिसरातील विहिरींमध्ये शिल्लक असल्याने मार्चअखेरीस गुळवंच, सुळेवाडी, केपानगर, हिवरगाव या ठिकाणीही टॅँकरची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. यामुळे बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत. (वार्ताहर)