संत नामदेव स्मारकाचा पंढरपूर विकास आराखड्यात समावेश
By Admin | Updated: June 1, 2014 01:16 IST2014-06-01T01:05:46+5:302014-06-01T01:16:29+5:30
भुजबळ : नामदेव समाजोन्नती परिषद अधिवेशनास प्रारंभ

संत नामदेव स्मारकाचा पंढरपूर विकास आराखड्यात समावेश
भुजबळ : नामदेव समाजोन्नती परिषद अधिवेशनास प्रारंभ
नाशिक : संत नामदेव हे केवळ शिंपी समाजाचे संत नाहीत तर ते अखिल भारतीय संत आहेत़ त्यांचे भागवत व मानवता धर्माच्या प्रसाराचे कार्य महान आहे़ पंढरपूर शहर विकासासाठी शासनाच्या वतीने ३५० कोटींचा आराखडा तयार केला असून, या आराखड्यात संत नामदेव यांच्या स्मारक ाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले़
तुपसाखरे लॉन्स येथे नामदेव समाजोन्नती परिषदेचे ५३वे अधिवेशन व वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़
भुजबळ म्हणाले, संत नामदेव सर्वांमध्ये पुजनीय आहेत़ त्यांचे स्मारक व्हावे यासाठी शासन पुढाकार घेऊन लवकरच मार्ग काढेल़ जगाची अब्रू झाकणारा शिंपी समाज कापडाच्या तुकड्यांप्रमाणे अनेक पोटजातीत विखुरला आहे़ यामुळे आरक्षणाचे लाभ मिळताना अडचणी येत असतात़ ओबीसीमध्ये समावेश असलेल्या सर्व जातींनी आपल्या पोटजाती संपवून एक होण्याची गरज आहे़ ओबीसी सक्षम केली तरच सर्वांना लाभ होणार आहे़ राजकारण करणे सोपे आहे़ परंतु समाजकारण करताना अनेक अडचणी येतात़ प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी काम करावे; परंतु आपण ओबीसी आहोत याचा विसर मात्र पडता कामा नये़
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्राबाहेर जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारे नामदेव हे एकमेव संत आहेत़ केवळ भागवत धर्माचा प्रचार न करता पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी जगाला दिला आहे़ तोच वारसा शिंपी समाजाने पुढे चालवावा़ अधिवेशनाच्या माध्यमातून तरुणांचेही संघटन करून नवनव्या संधींची माहिती त्यांना देऊन विकास साधणे आवश्यक आहे़
प्रास्ताविक करताना परिषदेचे अध्यक्ष ॲड़ मधुकर पिसे म्हणाले, नामदेव शिंपी समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद येत्या अधिवेशनात करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़
याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष संजीव तुपसाखरे, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य हरी नरके, राजन उरणकर, एल़ जी़ दाभोळ, उद्योजक रवि बारटक्के, नानासाहेब निकुंभ, संजय भावसार, शोभा कर्हाडकर, सरोज उरणकर, वृषाली तुपसाखरे, अनंत वायचळ, अरुण लचके आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल गिते यांनी केले़ आभार रत्नाकर लुंगे यांनी मानले़