संतांनी वेद वाङ्मयाची परंपरा जोपासली
By Admin | Updated: August 23, 2015 23:54 IST2015-08-23T23:54:29+5:302015-08-23T23:54:45+5:30
वेदमूर्तींचा सत्कार : वैदिक संमेलनात उमटला सूर

संतांनी वेद वाङ्मयाची परंपरा जोपासली
नाशिक : महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासह अनेक संतांनी वेद वाङ्मयाची परंपरा जोपासली. किंबहुना वेद वाङ्मयाचा विचार वृद्धिंगत झाला तो संत वाङ्मयातून असा सूर वैदिक संमेलनादरम्यान झालेल्या परिसंवादातून उमटला.
पूर्णवाद परिवार व जगदगुरू शंकराचार्य महासंस्थानच्या वतीने आयोजित संमेलनाच्या आज दुसऱ्या दिवशी ‘वेद पारायण व शास्त्र चर्चा’ या विषयावर परिसंवाद झाला. गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वेदशास्त्र संपन्न विनायक शास्त्री जोशी, चंद्रशेखर जोशी, विवेकशास्त्री गोडबोले, अशोक कुलकर्णी यांनी परिसंवादामध्ये सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण जोशी होते. याप्रसंगी विवेकशास्त्री यांनी बोलताना सांगितले की, संत वाङ्मयाला वेद वाङ््मयाबाबत आदर असून, वेद व संत वाङ्मयात सांगितलेला विचार एकसमान आहे. संतांनी वेदांच्या रक्षणाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. जीवनात वेदाचे महत्त्व याविषयी अशोक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. संतांनी सांगितलेली वचने व वेदांमधील वचने यामधील असलेले साम्य चंद्रशेखर जोशी यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतातून वेदातील महत्त्व, स्थान, याविषयी श्रीकृष्ण जोशी यांनी विवेचन केले.
दरम्यान, सकाळच्या सत्रात औरंगाबाद येथील आनंदराव मुठाळ यांचे ‘वैदिकाची ईश्वरधारणा’ या विषयावरील प्रवचनात वेदांचे व्यवहारावरील महत्त्व स्पष्ट केले. संध्याकाळच्या सत्रात विवेकशास्त्री यांनी ‘वेदसेवेसाठी उत्तम यजमान क से व्हावे’ याविषयी मार्गदर्शन केले.