शाहीस्नानाच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी साध्वी त्रिकाल भवंता न्यायालयात
By Admin | Updated: August 27, 2015 00:08 IST2015-08-27T00:08:28+5:302015-08-27T00:08:28+5:30
दावा दाखल : स्नानासाठी सीताकुंडाची मागणी

शाहीस्नानाच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी साध्वी त्रिकाल भवंता न्यायालयात
नाशिक : सिंहस्थात शैव व वैष्णव आखाड्यांची पेशव्यांनी स्नाननिश्चिती केली त्यावेळी साध्वींचा स्वतंत्र आखाडा अस्तित्वात नव्हता़ मात्र, २०१३ मध्ये अलाहाबादला स्वतंत्र महिला आखाड्याची निर्मिती झाली असून नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या दिवशी महिला साध्वींच्या स्नानासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ द्यावी या मागणीसाठी साध्वी त्रिकाल भवंता यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात बुधवारी (दि़२६) दावा दाखल केला असून त्यावर गुरुवारी (दि़ २७) निर्णय होण्याची शक्यता आहे़
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश राजेश पटारे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये सिंहस्थ हा चारशे वर्षांपूर्वी कावनई येथे होत होता़ त्यामध्ये साधू-महंतांमध्ये वाद होऊन सुमारे पंधरा हजार साधू मारले गेले होते़ याची दखल पेशव्यांनी घेऊन वैष्णवांच्या स्नानासाठी नाशिकमधील रामकुंड तर शैव पंथीयांसाठी त्र्यंबकेश्वर कुशावर्तामध्ये विभागणी केली़ तेव्हापासून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीस्नान होण्यास सुरुवात झाली़ तेव्हापासून तर आजपर्यंत पेशवाई मिरवणुका काढल्या जातात़
पेशव्यांनी ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी केवळ पुरुष साधू होते त्यामुळे महिला साध्वींच्या स्नानाचा प्रश्न निर्माण झाला नाही़; मात्र २०१३ मध्ये अलाहाबादला साध्वींच्या स्वतंत्र आखाड्याची निर्मिती झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला असून पुरुष साधूंप्रमाणेच साध्वींच्या शाहीस्नानासाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी करीत आहोत़; मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसून नाईलाजाने न्यायालयाकडे दाद मागावी लागते आहे़
साधू-महंतांचे शाहीस्नान आटोपल्यानंतरची वा सीताकुंडात जरी स्नानाची परवानगी मिळाली तरी ती मान्य असल्याचे दाव्यामध्ये म्हटले आहे़ या दाव्यामध्ये साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्यामध्ये अॅड़ प्रशांत जोशी काम पाहत आहेत़ तर सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील अॅड़ राजेंद्र घुमरे गुरुवारी (दि़ २७) न्यायालयात मांडणार आहेत़ दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय याबाबत प्रशासनास आदेश देण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)