हुसेनीबाबा यांचा गुरुवारी ‘संदल-ए-खास’ : ‘जुलूस-ए-हुसेनी’ची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 22:48 IST2017-09-06T22:44:36+5:302017-09-06T22:48:04+5:30
सालाबादप्रमाणे यंदाही जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हुसेनीबाबा यांचा गुरुवारी ‘संदल-ए-खास’ : ‘जुलूस-ए-हुसेनी’ची मिरवणूक
नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’ काढण्यात येणार आहे.
जुने नाशिकमधील चौकमंडई येथून बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने ‘जुलूस-ए-हुसेनी’ची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हजरत मौलाना सय्यद मुहम्मद महेमुद अशरफ उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी हुसेनी युवक मंडळाच्या वतीने बडी दर्ग्याच्या प्रांगणात महाप्रसादाचे (लंगर) वाटप केले जाणार आहे. त्यानंतर दर्ग्यात विशेष १६वी शबनिमित्त धार्मिक मैफल होणार आहे. संदलच्या निमित्ताने यंदा आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाई केल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोषणाईमुळे दर्गा परिसराचे रूप पालटले आहे.
प्रवचनाला लोटली गर्दी
भारतभूमीत आलेल्या सर्व सुफी संतांनी समाजाला मानवतेची शिकवण दिली. हजरत सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा हेदेखील मोठे सुफी संत होऊन गेले. त्यांनी माणुसकीला कायम प्राधान्य देत भक्तांच्या भावनेचा आदर केला. त्यांच्या दरबारात कधीही कुठल्याही भेदभावाला थारा नव्हता, असे प्रतिपादन ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना महेमुद अशरफ यांनी बुधवारी प्रवचनादरम्यान केले. इस्लाम व प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीही मानवता, सदाचार या नीतीमूल्यांची जोपासना करण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांच्यासह धर्मगुरू उपस्थित होते.
१५६८ साली बाबा नाशकात
हजरत सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा इ. सन १५६८ साली मदिना शरीफ येथून गुजरातमार्गे दौलताबाद आणि साल्हेर-मुल्हेर गावातून होत नाशिकमध्ये आले. बाबांक डे सर्व जाती-धर्माचे भक्त तेव्हाही येत होते. बहुतांश भक्त हे शाकाहारी असल्यामुळे बाबांनी सदर बाब लक्षात घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करत मांसाहार कायमस्वरूपी सोडण्याचा निर्धार केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. तेव्हापासून बाबांच्या दर्ग्यामध्ये प्रसाद म्हणून शाकाहारी खाद्यपदार्थ आणण्याची प्रथा सुरू झाल्याचे हाजी वसीम पिरजादा सांगतात.