सत्ताधारी कॉँग्रेसला अपयश आलेले दशक
By Admin | Updated: August 11, 2014 00:54 IST2014-08-10T22:36:56+5:302014-08-11T00:54:07+5:30
सत्ताधारी कॉँग्रेसला अपयश आलेले दशक

सत्ताधारी कॉँग्रेसला अपयश आलेले दशक
जात-पातीचे राजकारण घट्ट रुजलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात १९७८ पासून सतत साडेसात वर्षे आमदारकी ही पक्ष नव्हे, तर व्यक्तिनिष्ठ राहिली अन् ती सूर्यभान गडाखांनी भोगली. अगदी १९८५ च्या सुमारास सिन्नरच्या पटलावर तुकाराम दिघोळेंनी पुनरागमन केले अन् तेही धडाक्यात आमदारकी मिळवूनच साजरे केले. मराठाविरुद्ध वंजारी असा समाजवाद १९८५ च्या सुमारास जो सुरू झाला तो आजतागायत सुरूच आहे. त्या आधी १९७८ ला सूर्यभान गडाख यांनी सर्वप्रथम निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत बाजी मारली. त्यावेळी त्यांच्यासमोर जनता पक्षाकडून अॅड.सुदाम सांगळे, तर राष्ट्रीय कॉँग्रेसकडून निवृत्ती आव्हाड यांनी उमेदवारी केली. १९७८ मध्ये शरद पवार यांनी समाजवादी कॉँग्रेसची स्थापना करीत अन्य पक्षांना सोबत घेऊन पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करीत राज्यात कॉँग्रेसचे सरकार उलथावून पुलोदचे सरकार स्थापन केले. त्यावेळी सूर्यभान गडाखांनी मग अपक्ष म्हणून निवडून येऊनही नंतर शरद पवारांच्या पुलोदमध्ये आमदारकी अल्पकाळ भोगली. नंतर १९७९ मध्ये देशात लोकसभा निवडणुका होऊन त्यात पुन्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसचे सरकार आले. पुढे लगेचच इंदिरा गांधी यांनी पवार यांचा वचपा काढण्यासाठी १९८० मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेले महाराष्ट्रातील पुलोदचे सरकार बरखास्त करून राज्यात निवडणुका जाहीर केल्या. त्यावेळी मग सूर्यभान गडाख यांनी समाजवादी कॉँग्रेसकडून ४६६३९ मते घेत दणदणीत विजय मिळविला. राष्ट्रीय कॉँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या अशोक वाजे यांना त्यावेळी जेमतेम १६६९९ मतांवर समाधान मानावे लागले.
तसे पाहिले तर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठच असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. कारण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सूर्यभान गडाख यांना कॉँग्रेसचे देशात प्रबळ स्थान असतानाही सिन्नरला मात्र अपक्ष असूनही गडाखांनी बाजी मारावी, यातच काय ते आले. गडाख यांना त्यावेळी पंचायत समिती सभापतिपद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदांचा लाभ निवडणुकीच्या रिंगणात मतांचा जोगवा मागण्यासाठी झाला, हे जसे लपून राहिले नाही, तसेच त्यांचा मराठा कार्डचा प्रभावी वापरही लपून राहिला नाही. अवघ्या दोन-अडीच वर्षांच्या आमदारकीत सूर्यभान गडाखांनी पुढील विधानसभेचा पाया रचला. जनता पक्षाकडून उमेदवारी करणारे अॅड. सुदाम सांगळे कालांतराने कॉँग्रेसमध्ये स्थिरावले.
१९८० च्या निवडणुकीत जिल्ह्यातील पाच आमदार समाजवादी कॉँग्रेसचे निवडून देऊन शरद पवारांचे ‘हात’ बळकट करणाऱ्या नाशिकरांमध्ये सिन्नरकरांनी सूर्यभान गडाख यांना समाजवादी कॉँग्रेसकडून निवडून देत विधानसभेत पाठवून या समाजवादी कॉँग्रेसच्या लाटेत मोलाचा हातभार लावला, हे नाकारून चालणार नाही.
सतत सात-साडेसात वर्षे आमदारकी भोगल्यानंतर मात्र गडाखांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. ती नंतरही कायमच राहिली. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत सूर्यभान गडाख यांना शरद पवारांच्या समाजवादी कॉँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि निवृत्ती डावरे यांनी कॉँग्रेसची अधिकृत उमेदवारी केली. या निवडणुकीत वंजारी समाजाला तिकीट देण्याचे शरद पवारांनीच कबूल केल्यामुळे तुकाराम दिघोळे यांना समाजवादी कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली. तेथूनच वंजारी समाजाचे नेतृत्व म्हणून तुकाराम दिघोळे यांचा उदय झाला. तत्पूर्वी अनेक नेत्यांनी वंजारी समाजाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात कमी-अधिक प्रमाणात यशापयश आले. येथून तुकाराम दिघोळे यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे सलग साडेचौदा वर्षे आमदारकी त्यांनी उपभोगली. येथूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी चाचपणी केली. पुढे सलग दोनवेळा तालुकाप्रमुख असलेल्या दिगंबर देशमुखांनी सेनेचा भगवा खांद्यावर घेतला खरा, मात्र त्यांना विधानसभेवर जाता आले नाही.
१९७८ च्या पंचवार्षिक निवडणुकीपासून व्यक्तिनिष्ठ प्रवासाच्या दिशेने सुरू झालेला सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा प्रवास पुढे तसाच कायम राहिला. त्यामुळेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात कधी अपक्ष, तर कधी समाजवादी कॉँग्रेस पक्ष या अंगाने सूर्यभान गडाखांच्या रूपाने बिगर कॉँग्रेसच्या उमेदवारांनी आमदारकी मिळविली. कॉँग्रेसला सलग दोन वेळा पराभवाचे तोंड याच काळात पाहावे लागले. सिन्नर विधानसभा मतदारसंघात तेव्हापासूनच मराठा आणि वंजारी हा जातीवाद होत गेला. मात्र त्याची प्रकर्षाने जाणीव पुढील काळात झाली. १९७८ च्या निवडणुकीत सुदाम सांगळे आणि निवृत्ती आव्हाड हे दोन उमेदवार वंजारी समाजाचे असल्यानेही त्यावेळी अपक्ष असूनही सूर्यभान गडाख यांचा विजय या मतविभागणीमुळेच सुकर झाल्याचे त्यावेळी
बोलले गेले. देशात सत्ता गाजविणाऱ्या कॉँग्रेसला मात्र येथून आमदार मिळविण्यासाठी चक्क बराच काळ वाट पहावी लागली. त्यामुळेच हा मतदारसंघ पक्ष नव्हे, तर व्यक्तिनिष्ठ मतदारसंघ असल्याचे तेव्हापासून ते आजतागायत चित्र कायम आहे.