३८५ रुपये भरपाईसाठी हवा अहवाल !
By Admin | Updated: June 20, 2014 01:18 IST2014-06-20T01:00:50+5:302014-06-20T01:18:13+5:30
पंचनाम्यासोबत कोंबड्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल नसल्याने सदर महिलेला नुकसानभरपाई कशी द्यायची, सिन्नर ; असा अजब पेच सिन्नरच्या महसूल अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

३८५ रुपये भरपाईसाठी हवा अहवाल !
शैलेश कर्पे ल्ल सिन्नर
खुराड्यावर वीज पडून ११ गावठी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. या ११ कोंबड्यांच्या बदल्यात शासनाला ३५ रुपये कोंबडीप्रमाणे ३८५ रुपये नुकसानभरपाई देणे लागते. मात्र त्यासाठी या कोंबड्यांचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल शासनाला अपेक्षित आहे. पंचनाम्यासोबत कोंबड्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल नसल्याने सदर महिलेला नुकसानभरपाई कशी द्यायची, असा अजब पेच सिन्नरच्या महसूल अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
सोमवारी (दि. २ जून) सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला होता. गोंदे शिवारातच परंतु गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पाटोळे रस्त्याच्या कडेला मीराबाई हनुमंता तांबे यांची वस्ती आहे. घरासमोरच कोंबड्यांचे खुराडे आहे. २ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या खुराड्यावर वीज कोसळली. त्यात तांबे यांच्या ११ गावठी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तांबे यांनी दुसऱ्या दिवशी याबाबत तलाठ्याकडे पंचनाम्याची विनंती केली. त्यानंतर मृत कोंबड्या जमिनीत खड्डा खोदून त्यात पुरण्यात आल्या.
तलाठी जे.यू. परदेशी यांनी साक्षीदारांसमक्ष पंचनामा करून ११ कोंबड्या मृत झाल्याने चार हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा सिन्नरच्या तहसील कार्यालयात सादर केला. तहसील कार्यालयाच्या आपत्ती कक्षाकडून नुकसानभरपाई देण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सदर पंचनाम्यासोबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोंबड्या मृत्युमुखी पडल्याबाबतचा शवविच्छेदनाचा अहवाल नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तांबे यांना भरपाई तरी कशी द्यावी, असा प्रश्न या महसूल अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
खरे तर ११ कोंबड्या मृत्युमुखी पडल्यानंतर शवविच्छेदनाला पशुवैद्यकीय अधिकारी कधी येणार आणि तोपर्यंत मृत कोंबड्या उघड्यावर तशाच कशा ठेवायच्या असा प्रश्न कोणालाही पडणे साहजिक आहे. नैसर्गिक आपत्तीत कोणाचे नुकसान झाल्यानंतर पंचनामा करायला तलाठी किती तत्परतेने येता हेही वेगळे सांगायला नको.