पेठ तालुक्यातील रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:55 PM2018-08-31T15:55:09+5:302018-08-31T15:55:19+5:30
पेठ -तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची या वर्षीच्या पावसाळ्यात दुरवस्था झाली असून नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गासह लहान मोठया सर्वच रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांसह प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे.
पेठ -तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची या वर्षीच्या पावसाळ्यात दुरवस्था झाली असून नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गासह लहान मोठया सर्वच रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांसह प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. नाशिक ते पेठ या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे गत वर्षापासून नुतणीकरणाचे काम सुरू असून या पावसाळ्यात वाहनधारकांना वाहन चालविताना वाईट अनुभव आला. पुर्वीचा रस्ताच शिल्लक न राहील्याने शिवाय एकेरी वाहतूक सुरू केल्याने वाहनधारकांमध्ये एकमेकांना जागा देण्यावरून खटके ऊडत असतात. तर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.
करंजाळी-हरसुल रस्त्याची चाळण
पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा करंजाळी ते हरसुल हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. याच रस्त्यावर करंजाळी सह कोहोर, कुळवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर अनेक शाळा महाविद्यालये आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या या रस्त्याची चाळण झाली असून डांबरच शिल्लक न राहील्याने सर्वत्र खड्डे पसरले आहेत. रात्री अपरात्री या रस्त्यावरून प्रवास करणेही धोक्याचे झाले असून रस्त्यात वाहन नादुरु स्त झाले तर कोणत्याही सुविधा नसल्याने अडकून पडण्याची वेळ येत आहे.