महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी
By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-01T22:52:07+5:302014-08-02T01:23:22+5:30
केंद्रीय मंत्रालयाला अवगत : पाऊस थांबल्यास कार्यवाही

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्याची बाब केंद्रीय भूपृष्ट मंत्रालयाने गांभीर्याने घेतली असून, शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी व रस्त्याचे काम करणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याठिकाणी डोंगरावरून कोसळणारा धबधबा आहे. त्याचे पाणी जमिनीखाली शिरून रस्ता खचल्याचा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे.
दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे सततच्या पावसामुळे याच मार्गावर रस्ता खचला होता. त्यानंतर त्याची डागडुजी करण्यात आल्याने आता तो भाग व्यवस्थित असल्याची पुष्टीही या अधिकाऱ्यांनी जोडली.
कसारा घाटात गुरुवारी दुपारी रस्ता खचल्याची बाब वाहनचालकांच्या निदर्शनास आल्याने हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन एका बाजूची वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्णातील माळीण येथे अशाच प्रकारे डोंगर खचून संपूर्ण गावच्या गाव नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वर्दळीच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग खचण्याच्या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाशी संपर्क साधून संचालक तावडे यांना त्याबाबतची माहिती दिली व केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली असता, तावडे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामार्गाची पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर, गॅमन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन आदिंनी महामार्गाला भेट देऊन पाहणी केली.
कसारा घाटात अजूनही पाऊस सुरू असल्याने खचलेल्या रस्त्याची डागडुजी तातडीने करणे शक्य नाही; परंतु पाऊस थांबल्यानंतर त्यातील भेगा भरून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. कसारा घाटात चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात धबधबे असून, त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकतो, असा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे.