रस्ता की मृत्यूचा सापळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:51 IST2020-02-12T22:38:36+5:302020-02-12T23:51:43+5:30

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.

Road or death trap! | रस्ता की मृत्यूचा सापळा!

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात लोणी रस्त्याची झालेली दुरवस्था.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे-लोणी महामार्ग : जीवघेणा प्रवास; दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त

नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
सिन्नर - संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून हा महामार्ग जात आहे. सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता हा सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत आहे. या भागातच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा दुचाकीस्वारांना खड्डे वाचविताना अपघाताला सामोरे जावे लागले आहेत. नांदूरशिंगोटे - लोणी महामार्गावर पळसखेडे, निमोण, पिंपळे, नानज, तळेगाव, वरझडी, लवारे-कसारे आदी गावे येत असून, या भागातील नागरिकांचा दोन्ही तालुक्यांशी दररोजचा संपर्क येत असतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
शिर्डी येथील साईबाबा मंदिर, शनिशिंगणापूर, मढी, मोहटादेवी, तसेच कोपरगाव व अहमदनगर येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा व सोयीचा असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाने अवजड वाहनाची वर्दळ मोठी असल्याने डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे.
परिसरात मोठी बाजारपेठ तसेच कांद्याचे उपबाजार असल्याने या ठिकाणी व्यापारी, दुकानदार, शेतकरी, शालेय विद्याथी आदींसह चाकरमनांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी
गेल्या दोन ते तीन वर्षांच्या काळात या रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र रस्त्याची परिस्थिती जैसे-थे आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर डिसेंबर महिन्यात जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची मलमपट्टी केली जाते. काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. महिला, प्रवाशी, रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. डांबर उखडले गेल्याने माती व धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

खासगी वाहनाचा जाण्यास नकार !
गेल्या अनेक महिन्यांपासून नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता खराब झाल्याने खासगी वाहनचालक निमोण व तळेगाव भागाकडे जाण्यासाठी टाळाटाळ करतात. कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तसे वाहनधारकांनाही मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Road or death trap!