रस्ते खणणाऱ्या ठेकेदाराला अभय
By Admin | Updated: September 5, 2015 00:10 IST2015-09-05T00:07:16+5:302015-09-05T00:10:00+5:30
बॅरिकेडिंगमुळे खड्डे : स्थानिकांवर कायद्याचा बडगा

रस्ते खणणाऱ्या ठेकेदाराला अभय
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी मंडप वा रस्त्यावर खड्डा खणल्यास पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या महापालिका प्रशासनाने मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी सांगितल्यानुसार भर रस्त्यावर खड्डे खणून बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर कायम ठेवल्याने नुकतेच नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे.
कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या दिवशी पोलिसांनी ठेका दिलेल्या बॅरिकेडिंग ठेकेदाराने शहराच्या चहुबाजंूनी बल्ली-बॅरिकेडिंगने मुसक्या आवळताना महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे खणून रस्ते बंद केले. या बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला हा भाग वेगळा असला तरी, प्रत्यक्षात बॅरिकेडिंग काढल्यानंतर ठेकेदाराने केलेले खड्डे मात्र अद्यापही तसेच आहेत. महापालिकेने कुंभमेळ्यानिमित्त शेकडो कोटी रुपये खर्च करून शहरातील अंतर्गत व बाह्य रस्त्यांचे बळकटीकरण केले आहे. आता तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची भविष्यात आर्थिक कारणास्तव डागडुजी होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे सध्या तयार रस्त्यांची अधिकाधिक काळजी घेणे एवढेच महापालिकेच्या हाती आहे. परंतु पहिल्या पर्वणीला बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदाराने अनेक रस्त्यांवर खड्डे खणून केलेल्या बॅरिकेडिंगमुळे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावर मंडप उभारणारे तसेच खड्डे खणण्याबाबत नाशिक महापालिकेने धोरण ठरविले असून, रस्त्यावर एक खड्डा खणल्यास थेट ५० हजार रुपये दंडाची तरतूद त्यात करण्यात आलेली आहे. होऊ घातलेल्या गणेशोत्सव सार्वजनिक मित्र मंडळाला महापालिकेकडून तशी स्पष्ट सूचनाही देण्यात आलेली असून, रस्त्याच्या तोडफोडीवर खास लक्षही ठेवण्यात येणार आहे. याच कारणास्तव महापालिकेने नवीन नळ कनेक्शन देताना रस्त्याची तोडफोड होते म्हणून परवानगी देण्यास नकार सुरू केला आहे. म्हणजे नाशिककरांना कायद्याचा बडगा दाखविण्याची तयारी करणाऱ्या महापालिकेने बल्ली बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर दाखविली असून, अगोदरच पोलिसांकडून बॅरिकेडिंगचा ठेका पदरात पाडून ठेकेदाराने चांगभलं केलेले असताना आता महापालिकाही त्याला अभय देत असल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)