रस्त्यांची झाली चाळण!
By Admin | Updated: July 29, 2014 00:53 IST2014-07-29T00:42:37+5:302014-07-29T00:53:43+5:30
खड्डेच खड्डे : शहर चाललेय खड्ड्यात

रस्त्यांची झाली चाळण!
नाशिक : पावसाळा आला की खड्डे पडणारच हे समीकरण नाशिकमध्ये सुरू झाले असून, गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करावा लागत आहे. यंदाही रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. अगोदच रिलायन्सने खोदलेले खड्डे आणि त्यात पावसाने खोदलेले खड्डे यामुळे यंदा विक्रमी खर्च होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील खड्डे हे मुंबईच्या खड्ड्यांच्या संख्येशी स्पर्धा करीत आहेत. पावसाळ्यात अशा प्रकारे खड्डे तयार झाल्यानंतर त्यामुळे अपघात होतात; परंतु अनेक जण जायबंदीदेखील झाले आहेत. महापालिका खड्डे बुजवल्याचा दावा करीत असली, तरी प्रत्यक्षात मात्र एका ठिकाणचा बुजवला की दुसऱ्या ठिकाणी खड्डे तयार होतात. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महापालिकेने साडेतीन हजार खड्डे आणि ओघळ्या बुजवल्याचा दावा केला. साडेसातशे खड्डेच बुजवणे बाकी असल्याचे नमूद केले. परंतु पाऊस वाढला आणि रस्त्यांची चाळण झाली आहे.
दर तीन वर्षांनी रस्त्यांवर डांबराचे अस्तरीकरण करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होत नाही, असा पालिकेचा दावा आहे. तथापि, अनेक ठिकाणी नव्याने झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. साहजिकच खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)