रिंगरोडची टोलवाटोलवीं
By Admin | Updated: July 7, 2014 00:14 IST2014-07-06T22:08:18+5:302014-07-07T00:14:10+5:30
रिंगरोडची टोलवाटोलवीं

रिंगरोडची टोलवाटोलवीं
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर
आगामी सिंहस्थ आराखड्यातून त्र्यंबकेश्वरातील महत्त्वाचा असलेल्या रिंगरोडचा निम्मा भाग वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे, तर याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग टोलवाटोलवी करीत असून, दोन्ही विभाग झाल्या चुकीची जबाबदारी स्वीकारताना दिसत नाहीत.
शहराच्या रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये या हेतूने १९९२-९३च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील सर्व अखाड्यांना जोडणारा रस्ता म्हणून रिंगरोडची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सदरील रिंगरोडच्या विकासाचे व नूतनीकरणाचे काम
हाती घेण्यात आले होते; मात्र
अर्ध्याच रस्त्याच्या विकासाचे
काम मंजूर आराखड्यानुसार होणार असून, उर्वरित रस्त्याचे काय होणार याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबक पालिकेसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याअंतर्गत विविध दहा कामांचा समावेश आहे. यात रस्ता कॉँक्रिटीकरण, वाहनतळ विकास, शेड बांधकाम, शौचालय बांधकाम, पथदीप, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आदि कामांचा समावेश केला गेला असताना मात्र, निरंजनी अखाडा ते रिंगरोड जेथून सुरू होतो त्या नाशिक - त्र्यंबक रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचा समावेश ना पालिकेने केला, ना सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यामुळे सदरचा रस्ता आता विकासापासून वंचित राहण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निरंजनी अखाड्यापर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तेथून पुढचे सुमारे दीड कोटीचे काम मात्र मंजुरीअभावी लटकले आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पुरवणी आराखड्यात सदरील कामाचा समावेश करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.